बुलढाणा: आदिवासी आणि दुर्गम भागातील आरोग्य केंदाच्या परिसरात लाखो रुपयांचा औषधसाठा जाळल्याची धक्कादायक घटना आज 17 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी, जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांनी माहिती दिली.

बुलढाणा: जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील वसाली प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर लाखो रुपयांचा वैध आणि अवैध औषधसाठा जळून खाक झाल्याचे धक्कादायक वास्तव 17 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आले. याशिवाय, आरोग्य केंद्रातील अनियमित कारभार देखील समोर आल्याने केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या जिल्ह्यातील आरोग्य सुविधेची लक्तरे वेशीला टांगल्याचे विदारक चित्र दिसून आले.
राज्य शासनाने शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत सुविधाकडे प्राधान्याने लक्ष दिले असले तरी अनेक ठिकाणची परिस्थिती अतिशय बिकट आहे. बुलढाणा जिल्हाही याला अपवाद ठरला नाही. ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा पुरविण्याची शासनाची जबाबदारी असताना पुरेसे मनुष्यबळ नसणे, तांत्रिक उपचार पद्धतीचा अभाव या कारणांमुळे योग्य तशी आरोग्य सुविधा मिळत नाही. परिणामी गाव- खेड्यातील लोकांना शहराठिकाणी खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका आदिवासी आणि दुर्गम भाग म्हणून परिचित आहे. येथील वसाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या आरोग्य केंद्राचे उद्घाटन होऊन एक वर्षही उलटले नाही तोच केंद्रात डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची गैरहजेरी दिसून आली. इतकेच नाही तर आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यासाठी कार्यालयीन वेळेत कर्मचारी हजर नव्हते. केंद्राबाहेर लाखो रुपयांचा वैध आणि अवैध औषधसाठा जळून खाक झाल्याचे धक्कादायक चित्र दिसले.
परिचारकांवरच भार?
केवळ दोन परिचारक कर्तव्यावर हजर असल्याचे माध्यम प्रतिनिधींना दिसून आले. आरोग्य केंद्र परिसरात फेरफटका मारला असता एका कोपऱ्यात लाखो रुपयांचा वैध आणि अवैध औषधसाठा जाळण्यात आल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे यातील काही औषधांची मुदत संपलेली नसतानाही औषधसाठा कोणी व का जाळला हे अद्याप अस्पष्ट आहे.

दोषींवर कारवाई अटळ!
या प्रकरणासंदर्भात संग्रामपूर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशीची सूचना दिली आहे. प्रथमदर्शनी वैध औषधसाठा देखील जाळल्याचे दिसून आले आहे. यातील दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल. त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना ज्ञान कमी आहे, त्यांच्यात सुधारणा करून यापुढे अशी घटना घडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी कंत्राटी आहेत. यातील कुणी कारण नसताना गैरहजर असेल तर कंत्राटी सेवा समाप्त करू
– अमोल गीते, जिल्हा आरोग्य अधिकारी बुलढाणा
