बुलढाणा : लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधी हा ‘लोकसेवक’ असतो, याचे भानचं हल्ली जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिंधींना राहिले नसल्याची अनुभूती पदोपदी सामान्य माणसाला येत असते. पाच वर्षाची एक टर्म हाती आली की, एका एका मतासाठी वाडया वस्त्यांमध्ये पोहचत मतदारांच्या पायावर डोके टेकवून मतांची भीक मागणारे एकाच टर्ममध्ये भाऊ, दादा होऊन त्याच मतदारांना कस्पटासमान समजू लागतात.

बुलढाणा : लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधी हा ‘लोकसेवक’ असतो, याचे भानचं हल्ली जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिंधींना राहिले नसल्याची अनुभूती पदोपदी सामान्य माणसाला येत असते. पाच वर्षाची एक टर्म हाती आली की, एका एका मतासाठी वाडया वस्त्यांमध्ये पोहचत मतदारांच्या पायावर डोके टेकवून मतांची भीक मागणारे एकाच टर्ममध्ये भाऊ, दादा होऊन त्याच मतदारांना कस्पटासमान समजू लागतात. आपण मालक नाही, नोकर आहोत हे वास्तव मानायलाचं ते तयार होत नाहीत. काही अपवाद वगळले तर, यत्र, तत्र सर्वत्र असेच चित्र आहे हे नाकारून चालणार नाही. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जळगाव जामोद मतदार संघाचे भाजपाचे आमदार डॉ.संजय कुटे यांनी सभागृहातील त्यांच्या भाषणातून आपल्या पक्षाच्याच नव्हेतर, सर्व राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सत्यतेचा आरसा दाखविला तो काहींना फारसा पटला नसावा. मात्र आ.कुटे जे बोलले त्यातून सकारात्मक राजकीय अभिसरणाचा प्रारंभ होतोय, असे मानायला हरकत नसावी.
आ.संजय कुटे यांनी आपल्या भाषणातून जे विषय हाताळले ते, अत्यंत संवेदशील अशा मराठा, ओबिसी व धनगर, बंजारा आरक्षणा संदर्भातील असल्याने त्यांच्या या भाषणाकडे सर्वांचेच लक्ष होते. जी गोष्ट होणार नाही, हे सर्वच राजकीय पक्षांना माहिती असताना आपल्या गठठा मतदानासाठी त्या गोष्टींवर आपण लोकप्रतिनिधी विनाकारण मतदारांना अंधारात ठेवतो अशा शब्दातून त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधीत्वाबाबद दाखविलेली निष्ठा वाखाणण्याजोगी नक्कीच आहे. आरक्षणामुळे समाजासमाजामध्ये निर्माण झालेल्या व्देषाला आपण राजकारणीच जबाबदार असल्याचे सांगून आपण राजकारण्यांनी आत्मपरिक्षण करायला हवे, असा त्यांनी आपल्या सहकार्यांना दिलेला सल्ला अनेकांच्या डोळयात अंजन घालणारा असाच होता. त्या त्या समाजाला खुश करण्यासाठी आपण राजकारण्यांनी केलेल्या व्देषपूर्ण वक्तव्यामुळेच समाजात वाद निर्माण होतात. कोणत्या विषयात काय होणार? हे आम्हा सर्वच राजकीय नेत्यांना माहित आहे. मात्र व्होट बँक सांभाळण्याच्या नादात कोणताही प्रश्न आपण अंगावर घेतो. अशी प्रांजळ कबूली देत केवळ स्वत:ला पुढे घेऊन जायचं, अशा अविर्भावामुळे महाराष्ट्राचं भलं होणार नाही. असे सांगून लोकप्रतिनिधींनी लोकसेवेचं व्रत घेऊन जनतेचे सेवक आहोत, याचे भान ठेवण्याचा अप्रत्यक्ष सल्लाच आमदार संजय कुटे यांनी आपल्या त्या भाषणातून देऊन सभागृह जिंकले नसले तरी जनतेच्या मनाचा ठाव घेतला, एवढं मात्र नक्की!
