वणी : तालुक्यातील पळसोनी येथे भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा साठा जप्त केला.

वणी : तालुक्यातील पळसोनी येथे भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा साठा जप्त केला. या कारवाईत विविध कंपन्यांच्या नावाने विक्रीसाठी ठेवण्यात आलेली ८१ पाकिटे कापूस बियाणे जप्त करण्यात आली असून, त्यांची किंमत १ लाख १५ हजार ७० रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून अरुण शंकर भट (वय ४५, रा. पळसोनी ता. वणी) याच्याविरुद्ध बियाणे अधिनियम १९६८ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ६ मे रोजी रात्री ९ ते ९.२० वाजताच्या सुमारास आरोपीच्या राहत्या घरी करण्यात आली. तपासणीदरम्यान विविध कंपन्यांच्या नावाने विक्रीसाठी ठेवलेली प्रतिबंधित कापूस बियाण्यांची पाकिटे आढळून आली. यामध्ये आर-६५९ आरआर ५जी, पुषा ५जी, माऊली-५, सिल्व्हर ५जी, कावेरी सीड्स ५जी, गॅलेक्सी हायपर, जम्बो ५जी प्रीमियम, सुरक्षा, धूम-२ आणि हरियाली ७०२ या ब्रँडच्या बियाण्यांचा समावेश आहे. काही बियाण्यांचे नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी सीलबंद करून पाठविण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात ही बियाणे भारत सरकारने प्रतिबंधित केलेली असून अनधिकृतरीत्या साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेका अविनाश चिकराम, पोलीस स्टेशन वणी करीत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. अनधिकृत व प्रतिबंधित बियाण्यांचा वापर केल्यास उत्पादन घटण्यासह आर्थिक फटका बसू शकतो, असा इशाराही विभागाने दिला आहे.


