शेगाव : भारतीय संविधान सभेमध्ये जेव्हा शिक्षक मतदारसंघाची मागणी केली गेली आणि तसा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला त्याला खूप विरोध झाला. पण त्याच प्रस्तावाच्या समर्थनार्थ फक्त अमरावतीचे डॉ. पंजाबराव देशमुख उभे होते. देशाच्या कृषीक्रांतीचे जनक असलेल्या पंजाबराव देशमुख यांनी निर्माण केलेल्या अमरावती शिक्षक मतदारसंघातून गेली अनेक वर्ष शिक्षकांचा आवाज जो विधानपरिषदेत उठायला हवा होता, तो उठत नाही आहे. प्रा. बी. टी देशमुख सरांच्यांनंतर सभागृहामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती फक्त शिक्षक भारतीचे अमरावती विभागीय अध्य़क्ष सुरेश देवकर सरचं भरुन काढतील, असा ठाम विश्वास शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

शिक्षक भारतीच अमरावती शिक्षक मतदारसंघाची पोकळी भरुन काढेल : कपिल पटील
शेगाव : भारतीय संविधान सभेमध्ये जेव्हा शिक्षक मतदारसंघाची मागणी केली गेली आणि तसा प्रस्ताव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला त्याला खूप विरोध झाला. पण त्याच प्रस्तावाच्या समर्थनार्थ फक्त अमरावतीचे डॉ. पंजाबराव देशमुख उभे होते. देशाच्या कृषीक्रांतीचे जनक असलेल्या पंजाबराव देशमुख यांनी निर्माण केलेल्या अमरावती शिक्षक मतदारसंघातून गेली अनेक वर्ष शिक्षकांचा आवाज जो विधानपरिषदेत उठायला हवा होता, तो उठत नाही आहे. प्रा. बी. टी देशमुख सरांच्यांनंतर सभागृहामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती फक्त शिक्षक भारतीचे अमरावती विभागीय अध्य़क्ष सुरेश देवकर सरचं भरुन काढतील, असा ठाम विश्वास शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

रविवार, २६ जुलै रोजी शेगाव येथील हॉटेल कृष्णा कॉटेज येथे शिक्षक भारती संघटनेचे जिल्हास्तरीय अधिवेशन हजारो शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी ते बोलत होते. विचारपीठावर शिक्षक भारतीचे कार्यध्यक्ष सुभाष मोरे, शिक्षक भारतीचे अमरावती विभागीय अध्यक्ष सुरेश देवकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना कपिल पाटील म्हणाले की, देवकर सरांचे व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्वगुण आणि विचारधारेशी कमिटमेंट हे वाखण्याजोगे आहे. पुरोगामी, समाजवादी आणि सत्यशोधकी विचारधारा घेऊन हा माणूस मार्गक्रमण करत असल्यामुळे मी त्यांच्या पाठिशी आहे. एवढी मोठी जी संख्या जमलेली आहे, ही संख्या सांगते की एका जिल्ह्याच्या मेळाव्याला जर एवढी ताकद असेल, तर बाकीच्या पाच जिल्ह्यांची काय स्थिती असेल. यावरुनच देवकर सर शिक्षकांचे आमदार होणे, हे निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक भारतीच्या लढ्यामुळेच कन्याकुमारीपासून ते काश्मीपर्यंत सर्व शाळांमध्ये, कार्यक्रमांमध्ये सावित्रीबाई फुले व फतिमा शेख यांचा फोटो लावला जातो, याचे आत्मीक समाधान असल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे संचालन अकोला जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक मनोज देशमुख तर आभार प्रदर्शन माजी प्राचार्य अशोक खोरखडे यांनी केले. अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी शेगाव तालुकाध्यक्ष नितीन वाढे व संपूर्ण तालुका कार्यकारिणीने परिश्रम घेतले.

ही तर देवकर सरांच्या विजयाची नांदी : सुभाष मोरे
शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून सातत्याने कपिल पाटील शिक्षकांच्या प्रश्नांवर आवाज बुलंद करत आहे, हे सांगताना कार्य़ाध्यक्ष सुभाष मोरे म्हणाले की, जेव्हा 2006 साली कपिल पाटील पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हा त्यांनी आम्हाला विचारले की आपला प्रश्न काय? तर आम्ही त्यांना म्हटले की, एक तारखेला पगार मिळत नाही. आपल्याला एक तारखेला पगार मिळाला पाहिजे आणि तो संघर्ष आपण केला आणि एक तारखेला पगार सुरू झाला. केंद्रामध्ये प्रसूती रजा होती, परंतु राज्यामध्ये ती मिळत नव्हती. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व महिला शिक्षकांना सहा महिन्याची प्रसूती रजा मंजूर करण्याचे काम कपिल पाटील यांनी केले. अधिवेशनाला सावित्री-फातिमांच्या लेकी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. जेव्हा महिला एकत्र निर्णय करतात, तेव्हा तो १०० टक्के यशस्वी होतो. हे अधिवेशन देवकर सरांच्या विजयाची नांदी असल्याचे भाष्य सुभाष मोरे यांनी केले.

लढूया आणि जिंकूया : सुरेश देवकर
शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटलांच्या रूपाने गेली १८ वर्ष सतत आपला आवाज महाराष्ट्राच्या विधीमंडळात कडाडत होता. कपिल पाटलांनी निवृत्ती घेऊन मोठ्या मनाने आपली जागा सुभाष मोरे सरांना दिली. त्यांचा अवघ्या ६२ मतांनी पराभव झाला. गेली दोन-तीन वर्ष झाली, शिक्षक भारतीचा आमदार सभागृहामध्ये नाही. परिणामी शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आपल्या संघटनेचा आमदार सभागृहामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. मी डिसेंबर २०२६ च्या अमरावती शिक्षक मतदारसंघात शिक्षक भारतीचा चेहरा म्हणून आपल्यासमोर उभा राहणार असल्याचे शिक्षक भारतीचे अमरावती विभागीय अध्यक्ष सुरेश देवकर यांनी स्पष्ट केले. शिक्षक भारतीचा उमेदवार म्हणून तुमचा आवाज नेहमीकरिता रस्त्यावर, चौकात, सभागृहात बुलंद ठेवेल. शिक्षक भारती सारखी संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असणारी संघटना व कपिल पाटील आपल्यासोबत असल्याने आपण पूर्ण शक्तीनिशी विजयी होणार असल्याचेही सुरेश देवकर म्हणाले.


