Severe heat waves in the country: देशासह राज्यभरात तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारही अलर्ट मोडवर आले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने या संदर्भात राज्यांना पत्र लिहून सतर्क केले आहे. हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जर उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या दुप्पट झाली तर २०२५ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष असेल.
नवी दिल्ली : देशभरात एकीकडे वाढता उष्मा चिंतेचे कारण ठरत आहे. हवामान विभागाने यंदाचा उन्हाळा अधिक असेल असा अलर्ट दिल्यानंतर देशभर तीव्र उष्णतेचे इशारे देण्यात येत आहेत. आता देशासह राज्यभरात तापमान झपाट्याने वाढू लागले आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारही अलर्ट मोडवर आले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने या संदर्भात राज्यांना पत्र लिहून सतर्क केले आहे. हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जर उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या दुप्पट झाली तर २०२५ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष असेल.
वाढत्या तापमानामुळे लोक उष्माघाताला बळी पडू शकतात. त्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांना रोखण्यासाठी देखरेख करण्यासाठी आरोग्य सुविधांची प्रभावी तयारी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मार्गदर्शक कागदपत्रे सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. उष्णतेच्या लाटेसंबंधित आरोग्यविषयक परिणाम टाळण्यासाठी आणि परिस्थिती हाताळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जिल्हा स्तरावर पोहोचवाव्यात. तसेच, राष्ट्रीय हवामान बदल आणि मानव आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत वर्च्युअल ट्रेनिंग सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, जे आरोग्य तज्ञांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी राज्यांनी घ्यावी, असे केंद्र सरकारने राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
हवामान विभागाने पुढील 3-4 दिवसांसाठी हीटवेवचा इशारा दिला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे राज्य, जिल्हा आणि शहर पातळीवर आरोग्य विभागाने ‘हीट-हेल्थ अॅक्शन प्लान’ प्रभावीपणे राबवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. उष्णतेच्या लाटांचा सामना करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने इतर आपत्ती व्यवस्थापन संस्था आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने उपाययोजना कराव्यात, तसेच उष्णतेच्या परिणामांचे व्यवस्थापन आणि आकलन करण्यावर भर द्यावा असंही केंद्र सरकारने पत्राद्वारे सूचवले आहे.
तापमानाचा ताण अधिक जाणवेल
हवामान विभागाच्या अहवालानुसार, मार्च 2025 मध्ये देशातील बहुतांश भागांत तापमान सामान्यपेक्षा अधिक राहिले आहे. मार्च ते मे 2025 या कालावधीत, ईशान्य भारत, सुदूर उत्तर भारत आणि दक्षिण-पश्चिम भाग वगळता, देशातील बहुतेक ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटा जाणवण्याची शक्यता आहे. मध्य भारत, उत्तर-पश्चिम भारत आणि पूर्व भारतातील काही भागांमध्येही तापमानाचा ताण अधिक जाणवेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
राज्यात तापमान ४० अंशाच्या वर
गत दोन दिवसांमध्ये अकोलासह चंद्रपूर, जळगाव, अमरावती आणि ब्रह्मपुरी येथे तापमान ४० अंशांच्या वर होते. धुळे, जेऊर, मालेगाव, परभणी, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे.