‘Sant Gadge Baba Prabodhan Yatra’: ‘विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारल्यास समाजातील अंधश्रद्धा, चुकीचे समज आणि विविध प्रकारच्या अफवांवर मात मिळवता येते.” तेव्हा, आपण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेऊन व्यवहार करावा’, असे प्रतिपादन श्रीकृष्ण घोटे यांनी अंढेरा येथे केले.

अंढेरा : ‘विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारल्यास समाजातील अंधश्रद्धा, चुकीचे समज आणि विविध प्रकारच्या अफवांवर मात मिळवता येते.” तेव्हा, आपण विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेऊन व्यवहार करावा’, असे प्रतिपादन श्रीकृष्ण घोटे यांनी अंढेरा येथे केले. देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावात ३० जुलै रोजी ‘संत गाडगेबाबा राज्यस्तरीय प्रबोधन यात्रा’ दाखल झाली होती. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.
यात्रेच्या माध्यमातून अंढेरा पोलीस स्टेशन येथे अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती कार्यक्रम पार पडला. या उपक्रमास गावातील पोलीस पाटील, ग्रामस्थ, तरुणवर्ग आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्रीकृष्ण घोटे यांनी उपस्थितांना अंधश्रद्धा निर्मूलन, अघोरी प्रथा, जादूटोणा विरोधी कायदा, अंधश्रद्धेचा सामाजिक आणि वैयक्तिक परिणाम याविषयी सखोल माहिती दिली. ते म्हणाले, समाजातील सुशिक्षित वर्गाने विवेकबुद्धी वापरून कोणत्या गोष्टी अंधश्रद्धा आहेत आणि कोणत्या श्रद्धा आहेत, याचे स्पष्ट भान ठेवणे गरजेचे आहे. जे समाजासाठी चांगले कार्य करतात, त्यांच्या भावना दुखावू नयेत, पण जे “भोंदू बाबा” किंवा खोट्या धार्मिक उपचारांच्या नावाखाली फसवणूक करतात त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, “ही एक दुकानदारीच आहे, पण कोणत्या दुकानात जायचे हे ठरवणे हे प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिगत विवेकावर अवलंबून आहे,” असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी देऊळगाव राजा उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंढेरा पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार हेमंत शिंदे व दुय्यम ठाणेदार सुरेश जारवाल, तसेच सोनकांबळे, नितीन पुसे, खारडे, देठे आदी हजर होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याचे माहिती फलक लावण्यात आले होते. यामध्ये जादूटोणा, तंत्र-मंत्र, भूतबाधा, देवदेवस्की, बुवाबाजी, बालविवाह, नरबळी, आघोरी उपचार, भोंदूबाबा, अंधश्रद्धा यासारख्या चुकीच्या प्रथा व गैरवर्तनावर कठोर कायद्याची माहिती चित्रांसह सादर करण्यात आली होती.
गावकऱ्यांची अंधश्रद्धेविरुद्ध एकजूट!
गावकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत अंधश्रद्धेविरुद्ध एकजूट दर्शवली. समाजात विवेक, विज्ञाननिष्ठा आणि मानवतावादी विचार रुजवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
