Jalna News: तब्बल पाच कोटी रुपयांसाठी एका 13 वर्षीय शाळकरी मुलाचे अपहरण (Kidnapping)करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह सदर बाजार पोलिसांनी अटक केली. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

जालना : तब्बल पाच कोटी रुपयांसाठी एका 13 वर्षीय शाळकरी मुलाचे अपहरण (Kidnapping)करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह सदर बाजार पोलिसांनी अटक केली. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
25 जून रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान फिर्यादी कृष्णा गोपीनाथराव मुजमुले (38) यांचा 13 वर्षीय मुलगा घरातून सायकलवर नारायणा ई- टेक्नो या शाळेत निघून गेला. सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान फिर्यादीच्या मोबाइलवर र अज्ञात व्यक्तीने फोन करून म्हटले की, तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. त्यास सुखरूप परत पाहिजे असल्यास संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान देवमूर्ती येथे पाच करोड रुपये घेऊन या. रक्कम देऊन मुलगा परत घेऊन जा, काही हालचाल केली तर मुलास एड्स स्टेराईड्सचे इंजेक्शन देऊ अशी धमकी दिली होती. ही बाब फिर्यादीने तत्काळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांना सांगितली. पोलीस अधीक्षकांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खानाळ यांना पाचरण करून या प्रकरणाबाबत माहिती देऊन मुलाचा शोध सूचना व मार्गदर्शन केले.
पोलीस निरीक्षक यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार तसेच सदर बाजार जालना येथील पोलीस अधिकारी अमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून आरोपीकडील मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करून पथकास योग्य सूचना व मार्गदर्शन करून पथकासह मुलाचा शोध कार्यकामी रवाना झाले. अपहरण झालेल्या मुलाचे वडिलास सोबत घेऊन आरोपी सोबत वेळोवेळी संभाषण चालू ठेवले. आरोपींनी वारंवार पाच कोटी, तीन कोटी अशी पैशाची मागणी करून रात्री आठ वाजता पैशाची बॅग कन्हैया नगर येथील रिलायन्स पेट्रोल पंप मागे ठेवण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे पोलिसांनी त्या ठिकाणी व परिसरात सापळा लावून पैसे घेऊन जाण्यासाठी घेऊन आलेला आरोपी रोहित राजा भुरेवाल (रा. पुष्कर हॉस्पिटल समोर, जालना) यास सीताफिने पकडले. त्यास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस करून इतर दोन आरोपीं अरबाज अकबर शेख (रा. उडपी हॉटेल जवळ, टांगा स्टॅन्ड, जालना) आणि वरूण नितीन शर्मा (रा. गायत्री नगर, नवीन जालना) अशा तीन आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन ताब्यातील चारचाकी गाडीतील अपहरण झालेला तेरा वर्षीय मुलगा सुखरूप ताब्यात घेतला. आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.