सिंदखेडराजा:- दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह राताळी गावालगत आढळून आला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतक नारायण मैंद यांचा प्रेमविवाह प्रकरणातून अपहरण करून घातपात झाल्याची चर्चा होत आहे.

सिंदखेडराजा:- दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह राताळी गावालगत आढळून आला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतक नारायण मैंद यांचा प्रेमविवाह प्रकरणातून अपहरण करून घातपात झाल्याची चर्चा होत आहे.
मृत नारायण भाऊराव मैंद यांची येवता शिवारात बागायती शेती आहे .२५ वर्षापूर्वी राताळी येथील दामोदर पाटील यांच्या मुलीसोबत त्यांचा विवाह झाला होता. मात्र येवता येथील एका प्रेमविवाहाच्या प्रकरणात नारायण यांचे नाव जोडून त्यांना गेल्या पाच वर्षांपासून जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यामुळे नारायण व त्यांच्या पत्नी हे दोघेही, गेल्या दोन वर्षांपासून त्यांची सासुरवाडी असलेल्या राताळी येथे वास्तव्यास होते. सर्व काही सुरळीत सुरु असतांनाच गुरुवार ३ एप्रील रोजी दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी नारायण मैंद यांचे अपहरण केल्याची चर्चा राताळी गावात होती. गावातील लोकांनी नारायण यांचा राताळी परिसरातील शिंदी, मोहाड़ी शिवारात शोध घेतला, परंतु, ते कोठेही आढळून आले नाही. शनिवारी सकाळी काही महिलांना विठ्ठल गायकवाड यांच्या शेतातील बखारीमागील रोहित्राजवळ जवळ एका व्यक्तीचा मृतदेह दिसला. ही माहिती राताळी गावात पोहचली. त्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. तेव्हा तो मृतदेह नारायण मैद यांचा असल्याचे पुढे आले. या संदर्भात पोलिस पाटील यांनी साखरखेर्डा ठाणेदार गजानन करेवाड़ यांना माहिती दिली. ठाणेदारांनी त्यांनी सहकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. पंचनामा होत असतांनाच बुलढाणा येथील गुन्हे अन्वेषण शाखेची चमू घटनास्थळी दाखल झाली आहे. पंचनामा करीत मृतदेह सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
मृतदेह रात्रीच आणून टाकल्याचा संशय
नारायण मैंद हे दोन दिवसांपासून गायब होते. त्यामुळे राताळी व परिसरातील गावकरी त्यांच्या शोधातच होते. त्यांचे अपहरण केल्याची सुद्धा चर्चा होती. शनिवारी सकाळी जेथे त्यांचा मृतदेह आढळला, त्या गावाला लागून असलेल्या ठिकाणी सुद्धा दोन दिवस शोध घेतलेला होता. त्यामुळे नारायण मैंद यांचा खून करुन रात्री उशीरा मृतदेह रोहित्राजवळ आणून टाकला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.