वाशिम : वाशिम शहरात १ जून रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न (कलम ३०७) अंतर्गत गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी (५ जून) मोर्चा काढण्यात आला.

पोलीस अधीक्षकांना निवेदन; कठोर कारवाईची मागणी
वाशिम : वाशिम शहरात १ जून रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न (कलम ३०७) अंतर्गत गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी (५ जून) मोर्चा काढण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला मोर्चा पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानक मार्गे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर दुपारी सुमारे १२ वाजता धडकला. मोर्चादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल व शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय चौधरी यांच्या नेतृत्वात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यानंतर शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांची भेट घेऊन आरोपींना तातडीने अटक करावी, त्यांच्यावर कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच संबंधित ठिकाणांवरील अतिक्रमणे हटवावीत, अशा विविध मागण्या मांडल्या. यावेळी पोलीस अधीक्षकांनी आरोपींच्या शोधासाठी तीन विशेष पथके नियुक्त करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच प्रकरणातील कलमे वाढविण्याबाबत कायदेशीर पडताळणी करून आवश्यक निर्देश दिले जातील, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. मोर्चात सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काय आहे प्रकरण?
वाशिम शहरात १ जून रोजी मोटारसायकलला कट मारण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर प्राणघातक हल्ल्यात झाले. या घटनेत राजेश प्रल्हाद राऊत, प्रवीण राऊत, प्रतीक राऊत व अंकुश सोनटक्के यांच्यावर लोखंडी रॉड व इतर घातक शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. हल्ल्यात महिला व मुलासह इतर काहीजण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात शेख बाबर शेख अकबर, शेख ख्वाजा शेख हनिफ, शेख जावेद शेख रजाक, शेख पप्पू शेख हारून, शेख रफिक यांच्यासह काही अज्ञात महिला व पुरुष आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके नियुक्त केली आहेत.


