मुंबई : मैत्रीची भन्नाट केमिस्ट्री एका वेगळ्या अंदाजात मांडणारा ‘बाप्या’ हा मराठी चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्टर आणि गाण्यांमुळे आधीच प्रेक्षकांच्या नजरेत आलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. ट्रेलरमध्ये कथानकाची एक झलक पाहायला मिळते आणि ही कथा नेहमीसारखी सरळ नसून नात्यांच्या गुंतागुंतीतून पुढे सरकणारी आहे,

मुंबई : मैत्रीची भन्नाट केमिस्ट्री एका वेगळ्या अंदाजात मांडणारा ‘बाप्या’ हा मराठी चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्टर आणि गाण्यांमुळे आधीच प्रेक्षकांच्या नजरेत आलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. ट्रेलरमध्ये कथानकाची एक झलक पाहायला मिळते आणि ही कथा नेहमीसारखी सरळ नसून नात्यांच्या गुंतागुंतीतून पुढे सरकणारी आहे, हे स्पष्ट होते. चित्रपटात राजश्री देशपांडे साकारत असलेली ‘बाप्या’ ही व्यक्तिरेखा कथानकाच्या केंद्रस्थानी आहे.
‘शैलजा ते शैलेश’ असा तिचा प्रवास ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. या बदलामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नात्यांमध्ये मोठी उलथापालथ होते. तिचे लग्न गिरीश कुलकर्णी यांच्या पात्राशी झालेले असते आणि त्यांना एक मुलगाही असतो. मात्र, गिरीशच्या आयुष्यातील दुसरा पैलू समोर येताच कथेला वेगळेच वळण मिळते आणि इथूनच नात्यांमधील ताण, संघर्ष आणि गोंधळ वाढताना दिसतो.
ट्रेलरमध्ये “आपली यारी… गावावर भारी!” ही ओळ विशेष लक्ष वेधून घेते. या ओळीतून मैत्रीचा महत्त्वाचा धागा संपूर्ण कथेला जोडून ठेवतो, असे जाणवते. नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीत मैत्री कशी आधार देते आणि प्रत्येक पात्राच्या आयुष्यात काय बदल घडवते, याची उत्सुकता ट्रेलरमुळे निर्माण होते. हलक्याफुलक्या प्रसंगांसोबतच भावनिक क्षणांचीही सुंदर सांगड घालण्यात आली असून, प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो.
या चित्रपटात देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यांच्या अभिनयाची झलक ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दिसते आणि कथेला अधिक वजन मिळते. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर तिवारी यांनी केले आहे, तर मुत्कल तेलंग आणि समीर तिवारी यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे.
दिग्दर्शक समीर तिवारी यांनी ‘बाप्या’बद्दल बोलताना सांगितले की, ही कथा नात्यांभोवती फिरणारी असली तरी ती सरळसोट नाही. प्रत्येक नात्यामध्ये असलेली गुंतागुंत आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न त्यांनी या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


