वाशिम : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्याची सरासरी ११०.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे ४३ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. पैनगंगा नदीला यंदाचा पहिला पूर आला असून अरुणावती नदीही दुथडी भरून वाहत आहे. दुसरीकडे, विविध सिंचन प्रकल्पांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वाशिम : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्याची सरासरी ११०.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे ४३ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. पैनगंगा नदीला यंदाचा पहिला पूर आला असून अरुणावती नदीही दुथडी भरून वाहत आहे. दुसरीकडे, विविध सिंचन प्रकल्पांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

३० जुलै रोजी सकाळी १० ते ३१ जुलै रोजी सकाळी १० या २४ तासांच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद मेडशी व मुंगळा महसूल मंडळात प्रत्येकी १९२.८ मिमी, मालेगाव येथे १८४.५ मिमी, मानोरा व वारला येथे प्रत्येकी १७७.५ मिमी, शिरपूर व करंजी येथे प्रत्येकी १५५.३ मिमी, तर चांडस येथे १४२.३ मिमी झाली. याशिवाय अनेक महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने एकूण ४३ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे पैनगंगा, अरुणावतीसह प्रमुख नद्या व नाले दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. दरम्यान, सोनल, एकबुर्जी, आडोळ, अडाणसह विविध लघु व मध्यम सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. दीर्घ खंडानंतर झालेल्या या दमदार पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी सखल भागातील काही शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.जुलै महिन्यात जिल्ह्यात आतापर्यंत २७७.० मिमी (११३.७ टक्के) पावसाची नोंद झाली असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पूरस्थितीवर महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.


