दीपक शेजुळ / केदारखेडा : शेतकऱ्यांना शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या पशुधन विक्रीचे आठवडी बाजार ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी भरतात. भोकरदन तालुक्यातील केदरखेडा येथील आठवडी बाजार चांगलाच प्रसिध्द होता. मात्र, कोरोनाच्या काळात हा आठवडी बाजार बंद करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा बाजार बंद होता. दरम्यान, हा आठवडी बाजार आता पुन्हा सूरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

दीपक शेजुळ / केदारखेडा : शेतकऱ्यांना शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या पशुधन विक्रीचे आठवडी बाजार ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी भरतात. भोकरदन तालुक्यातील केदरखेडा येथील आठवडी बाजार चांगलाच प्रसिध्द होता. मात्र, कोरोनाच्या काळात हा आठवडी बाजार बंद करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा बाजार बंद होता. दरम्यान, हा आठवडी बाजार आता पुन्हा सूरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोना काळात केदारखेडा येथील आठवडी बाजार बंद पडला होता. कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने त्यावेळी सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे सर्व बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे गावोगावी भरणारे आठवडी बाजार देखील बंद करण्यात आले होते. भोकरदन तालुक्यात अनेक गावांत भरणाऱ्या आठवडी बाजारासोबत काही ठिकाणी पशुधनाचे आठवडी बाजार देखील भरत होते. पिंपळगांव रेणुकाई, केदारखेडा येथे पशुधन विक्रीसाठी देखील आठवडी बाजार भरत होता. कोरोनामुळे केदारखेडा येथील हा बाजार बंद करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत बंदच होता. पण गावचे सरपंच सतिष शेळके यांनी हा बंद पडलेला बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. खरेदीदार आणि विक्रेते यांच्यासाठी बाजार पट्टयात पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा उपलब्ध करून दिला. शिवाय एक वर्षासाठी या आठवडी बाजारात विक्रेत्यांकडून कोणताही कर घेतला जाणार नाही, असे जाहीर केले. त्यामुळे नुकताच हा पशुधनाचा आठवडी बाजार तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा फुलला आहे. हा बाजार सुरू झाल्यामुळे परिसरातील तीस ते चाळीस गावातील शेतकऱ्यांना मोठी सोय झाली आहे. शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक नाडी
पशुधन हे शेतकऱ्यांना सर्व अर्थाने सहाय्यभूत आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. शेतीसाठी मशागत, पेरणी, कोळपणी आदी कामे शेतकरी बैलांच्या साहाय्याने करतात. आधुनिक यंत्रांमुळे पशुधनाच्या वापरावर मर्यादा आलेल्या असल्या तरी सर्वच कामे यंत्राच्या साहाय्याने करता येत नाही. त्यासाठी बैलांची मदत होते. याशिवाय शेळी, कोंबड्या हे पशुधन पुरक व्यवसाय म्हणून शेतकरी वापरतात. पशुधनावर शेतकऱ्यांची आर्थिक नाडी अवलंबून असते.
पशुधन विक्रीसाठी आणावे : संदिप शेळके
केदारखेडा येथील आठवडी बाजार आता पूर्वीसारखा सूरू झाला आहे. हा बाजार एक वर्षासाठी ग्रामपंचायतीने करमुक्त केला आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही व्यापाऱ्याला, पशुधन विक्रेत्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. बाजारात विक्रेत्यांनी यावे, असे आवाहन सरपंच संदिप शेळके यांनी केले आहे.