तेल्हारा : गोवंश हत्या रोखण्यासाठी आणि कत्तलखान्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या मागणीसाठी सोमवार २७ एप्रिल रोजी तेल्हारा शहरात मोर्चा काढण्यात आला.

गोकुळ हिंगणकर / तेल्हारा : गोवंश हत्या रोखण्यासाठी आणि कत्तलखान्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या मागणीसाठी सोमवार २७ एप्रिल रोजी तेल्हारा शहरात मोर्चा काढण्यात आला. ‘गोमाता सन्मान दिन’ निमित्त आयोजित या आंदोलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या अनुषंगाने सोमवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून बाजारपेठा, दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवण्यात आली.
सोमवारी सकाळपासूनच शहरात गोभक्त, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. गोमाता पूजन करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर घोषणाबाजी करत शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला, जिथे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या नावे तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. गोवंश हत्या थांबवण्यासाठी कठोर कायदा लागू करावा, अवैध कत्तलखान्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि गोसंवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी, नगरातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने गोप्रेमी सहभागी झाले होते. संपूर्ण शहरात आंदोलनामुळे धार्मिक व सामाजिक वातावरण निर्माण झाले होते.गोमातेच्या संरक्षणासाठी एकजूट दाखवत तेल्हारा शहराने दिलेला हा प्रतिसाद विशेष ठरला असून, या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.


