मुंबई : बऱ्याच प्रतीक्षेनंतर भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे. नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, असे भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केले.

मुंबई : बऱ्याच प्रतीक्षेनंतर भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे. नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे, असे भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केले. दक्षिण भारतातील या राज्यात बऱ्याच काळापासून पाऊस सुरू होता, पण आता याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यात १ जूनला मान्सूनचे आगमन होणार होते.
हवामान विभागाने सुरुवातीला असा अंदाज वर्तवला होता की, केरळमध्ये मान्सून २६ मे पर्यंत दाखल होऊ शकतो. तेव्हा चार दिवसांचा विलंब किंवा लवकर आगमन होण्याचाही अंदाज वर्तवला होता. पावसाळा ३० मे पर्यंत सुरू होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती. तरीही मान्सूनला विलंब झाला. इतकेच नव्हे तर मान्सून नेहमीच्या १ जूनच्या तारखेला दाखल झाला नाही, त्यामुळे पावसाला चार दिवसांचा उशीर झाला. गुरुवारी सकाळी केरळच्या अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यात अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तिरुवनंतपुरम, कोल्लम, पत्तनमथिट्टा, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यात पावसाच्या सौम्य ते मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात दोन दिवसांत मान्सून
महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. ६ ते ७ तारखेला मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागात पावसाला सुरुवात होईल.


