रिसोड : शहरात सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने नगरपरिषदेच्या साफसफाई व्यवस्थेची पोलखोल केली. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून विशेषतः सिव्हिल लाईन परिसरात नाल्यांतील घाण पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.

सिव्हिल लाईनमध्ये घाण पाणी रस्त्यावर, नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांचा संताप
रिसोड : शहरात सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने नगरपरिषदेच्या साफसफाई व्यवस्थेची पोलखोल केली. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून विशेषतः सिव्हिल लाईन परिसरात नाल्यांतील घाण पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.

सिव्हिल लाईन, आंबेडकर चौक, भाजी मंडी, वाशिम नाका आदी भागांत पावसाचे पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. सिव्हिल लाईन परिसरातील नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने नाल्यांमध्ये कचरा व प्लास्टिक अडकल्यामुळे पाण्याचा निचरा रोखला गेला. परिणामी नाल्यांतील घाण पाणी व कचरा रस्त्यावर वाहून आला.
यामुळे परिसरातील रस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. घाणीमुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागला. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची प्रभावी साफसफाई करण्यात आली असती तर ही परिस्थिती टाळता आली असती, अशी तीव्र नाराजी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे दरवर्षी अशाच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंतही नागरिकांनी बोलून दाखवली. दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शहरातील साचलेले पाणी आणि घाणीच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने नाल्यांची साफसफाई करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दुसरीकडे, खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मात्र या पावसामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी पेरण्यांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


