जालन्यात गॅस टंचाईचा प्रश्न गंभीर, नागरिक त्रस्त; नेते मात्र सहलीत व्यस्त

जालना :  शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून गॅस मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. अनेक भागांत गॅसचा पुरवठा उशिराने होत असल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना कडक उन्हात एजन्सीसमोर तासन्तास रांगा लावाव्या लागत आहेत.

जालना :  शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून गॅस मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. अनेक भागांत गॅसचा पुरवठा उशिराने होत असल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना कडक उन्हात एजन्सीसमोर तासन्तास रांगा लावाव्या लागत आहेत. काही ठिकाणी गॅस उपलब्ध नसल्याने नागरिकांना एका एजन्सीकडून दुसऱ्या एजन्सीकडे भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, शहरात गॅस टंचाईचा प्रश्न गंभीर होत असताना काही लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेतेमंडळी अलीबाग येथे सहलीचा आनंद घेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. यामुळे संतप्त नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून जनतेच्या अडचणींकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.

राजकारणात एकमेकांवर टीका-टिप्पणी करणारे आणि सार्वजनिक मंचावर एकमेकांना पाण्यात पाहणारे अनेक नेते प्रत्यक्षात मात्र वैयक्तिक जीवनात एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरताना दिसतात, अशीही चर्चा शहरात होत आहे. मात्र या नेत्यांच्या राजकीय स्पर्धेमुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र परस्परांबद्दल वैर निर्माण होत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

“जनतेला मूलभूत गरजांसाठी रांगेत उभे राहावे लागत असताना लोकप्रतिनिधींनी परिस्थितीकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरातील गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नात लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

सध्या तरी गॅस टंचाईचा प्रश्न मार्गी लागण्याची नागरिक प्रतीक्षा करत असून, लवकरच ठोस उपाययोजना न झाल्यास या मुद्द्यावर आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »