खामगाव – गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या खामगाव शहरात 22 जून रोजी रात्री अखेर वरून राजाने हजेरी लावली. अचानक आलेल्या अर्ध्या तासाच्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, त्रस्त झालेल्या खामगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खामगाव – गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या खामगाव शहरात 22 जून रोजी रात्री अखेर वरून राजाने हजेरी लावली. अचानक आलेल्या अर्ध्या तासाच्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, त्रस्त झालेल्या खामगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जून महिना अर्धा संपत आला तरीही अपेक्षेप्रमाणे पाऊस पडत नसल्याने नागरिक चिंतेत होते. दिवसभर पडणारे कडक ऊन आणि रात्रीचा उकाडा यामुळे नागरिक घामाघूम होत होते. मात्र, आज रात्री 8 वाजेदरम्यान अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास शहरात मुसळधार पाऊस झाला.
वातावरणात गारवा, बच्चेकंपनीचा आनंद
या पहिल्याच जोरदार पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. अचानक आलेल्या पावसाने काहींची धांदल उडाली असली, तरी उष्णतेपासून सुटका झाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. लहान मुलांनी तर गल्लीबोळात बाहेर पडत पहिल्या पावसाचा मनसोक्त आनंद लुटला.
बळीराजा सुखावला
शहरासोबतच परिसरातील ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्याची माहिती आहे. या पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. हा पाऊस शेतीकामांसाठी पोषक ठरणार असल्याने शहरातील नागरिकांसोबतच परिसरातील बळीराजाही सुखावला आहे. आता हा पाऊस असाच सातत्य राखून राहील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


