भोकरदन : शहरातील शाळा आणि महाविद्यालयीन परिसरामध्ये टवाळखोरांनी उच्छाद मांडला असून, विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या गंभीर प्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तर पालकांमध्येही चिंता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, तत्काळ ‘दामिनी पथकाची’ स्थापना करून टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या नेत्या अनिता जाधव यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

भोकरदन : शहरातील शाळा आणि महाविद्यालयीन परिसरामध्ये टवाळखोरांनी उच्छाद मांडला असून, विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या गंभीर प्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तर पालकांमध्येही चिंता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, तत्काळ ‘दामिनी पथकाची’ स्थापना करून टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या नेत्या अनिता जाधव यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
भोकरदन हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थिनी उच्च शिक्षणासाठी दररोज शहरात येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शाळा-महाविद्यालये भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी टवाळखोर मुलींचा पाठलाग करणे, कमेंट्स पास करणे आणि त्यांना त्रास देण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. या त्रासामुळे अनेक विद्यार्थिनी मानसिक दडपणाखाली असून, काही मुलींनी तर शिक्षण सोडून देण्याची मानसिकता व्यक्त केली आहे. मुलींना शिक्षणासाठी पाठवायचे की नाही? असा प्रश्न आता पालकांना सतावत आहे. जाधव यांनी मागणी केलेल्या पत्रकात बसस्थानक परिसरातील विदारक स्थितीवर बोट ठेवले आहे. शाळा सुटल्यानंतर ग्रामीण भागातील मुलींना बसची प्रतीक्षा करावी लागते. याच संधीचा फायदा घेत टवाळखोर तरुण दुचाकीवरून घिरट्या घालणे, मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे आणि विचित्र आवाज काढून मुलींची छेड काढण्याचे प्रकार करत आहेत. या ठिकाणी पोलिसांची भीती उरली नसल्याचे चित्र दिसत आहे. महिला पोलिसांचे विशेष ‘दामिनी पथक’ स्थापन करून शाळा-कॉलेज परिसरात गस्त वाढवावी,
बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी असावी किंवा गर्दीच्या वेळी पोलिसांची विशेष नियुक्ती करावी, तर छेडछाड करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात यावी, मुलींना सुरक्षित वातावरण देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. जर पोलीस प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत आणि दामिनी पथकाची नियुक्ती केली नाही, तर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही अनिता जाधव यानी दिला आहे.
