मानोरा : पवित्र अधिक महिन्यानिमित्त अडाण नदीच्या पात्रात स्नान व पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या मावस-आतेभावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी(१४) सकाळी गोमुखेश्वर संस्थानजवळ घडली. शुभम अमोल धोंडे (१४, रा. इंझोरी) व दर्शन सुनील वावगे (२०, रा. भातकुली, जि. अमरावती) अशी मृतांची नावे असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

इंझोरी व भातकुली येथील युवकांचा मृत्यू; गोमुखेश्वर संस्थानजवळील घटना
मानोरा : पवित्र अधिक महिन्यानिमित्त अडाण नदीच्या पात्रात स्नान व पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या मावस-आतेभावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी(१४) सकाळी गोमुखेश्वर संस्थानजवळ घडली. शुभम अमोल धोंडे (१४, रा. इंझोरी) व दर्शन सुनील वावगे (२०, रा. भातकुली, जि. अमरावती) अशी मृतांची नावे असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

माहितीनुसार, अधिक महिन्यानिमित्त स्नानासाठी तसेच पोहण्यासाठी शुभम व त्याचा आतेभाऊ दर्शन हे दोघे अडाण नदीच्या पात्रात गेले होते. पोहत असताना नदीतील खोलगट गड्ड्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात ओढले गेले. पाण्यात बुडत असल्याचे नदीकाठी असलेल्या काही मुलांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला.
मुलांचा आवाज ऐकून नदीत मासेमारी करणारे कोळी बांधव तसेच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. स्थानिकांच्या अथक प्रयत्नांनंतर दोघांनाही पाण्याबाहेर काढण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती गावात पसरताच नातेवाईक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.

गावातील युवक विशाल वानखेडे यांनी तातडीने चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले. बेशुद्ध अवस्थेतील दोघांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. ही बातमी समजताच रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
एकुलत्या एक मुलाचा मृत्यू
मृत शुभम धोंडे हा अमोल धोंडे यांचा एकुलता एक मुलगा होता. तो गेल्या वर्षभरापासून आळंदी येथे वारकरी शिक्षण घेत होता. उन्हाळी सुट्टीनिमित्त तो गावी आला असताना काळाने त्याच्यावर झडप घातली. त्याच्यासह आलेल्या आतेभाऊ दर्शनचाही या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने धोंडे व वावगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन तरुण मुलांचा अकाली मृत्यू झाल्याने इंझोरीसह संपूर्ण मानोरा तालुक्यात शोककळा पसरली आहे.


