अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळ्यातील फरार पाच आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या सर्व आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळ्यातील फरार पाच आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या सर्व आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुनील रामकृष्ण सोरमारे (37), व्यवसाय मंडळ अधिकारी बदनापूर, रा. वालसा वडाळा, ता. भोकरदन, बप्पासाहेब रखमाजी भुसारे, (53), व्यवसाय तलाठी, रा. नूतन वसाहत अंबड, रामेश्वर नाना जाधव, (48) व्यवसाय तलाठी, रा. लोणार भायगाव, ता.अंबड, वैभव विश्वंभर आडगावकर, (36) व्यवसाय नेटवर्क इंजिनियर, रा.श्रीकृष्ण नगर, अंबड, विजय निवृत्ती भांडवले, (34) व्यवसाय ऑपरेटर, रा. कुंभारवाडी, ता. गेवराई, जि. बीड असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत 20 आरोपीना अटक करण्यात आली आहे.
शासनाने नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या जालना जिलह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून कोट्यावधी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. दरम्यान बोगस याद्या तयार करून या अनुदान वाटपात अपहार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर 240 गावांमधील या अनुदान वाटपात तब्बल 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा अपहार झाल्याचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यानंतर याप्रकरणात मंडळ अधिकारी, 22 तलाठी व कर्मचाऱ्यांसह 28 जणांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. तेव्हापासून पोलीस या आरोपींचा शोध घेत होते. यातील 15 आरोपींना पोलीसांनी यापुर्वीच अटक केली होती. फरार आरोपी जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात दाद मागत होते. परंतु सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाच्या छत्रपती सुभाजीनगर खंडपीठाने या आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अपर अधीक्षक आयुष नोपाणी, उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा सिध्दार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, गोकुळसींग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, पाठक मेजर, महिला अंमलदार जया निकम, निमा घनघाव, मंदा नाटकर यांनी केली.
