छत्रपती संभाजीनगर : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात कराडने दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने बुधवार, 17 डिसेंबर रोजी फेटाळून लावला.

छत्रपती संभाजीनगर : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात कराडने दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने बुधवार, 17 डिसेंबर रोजी फेटाळून लावला. त्यामुळे कराडला पुढील काळासाठीही कोठडीतच राहणार आहे. या निकालामुळे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वाल्मिक कराडने औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर शुक्रवार, 12 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सविस्तर सुनावणी झाली. मात्र, सरकारी पक्षाचा युक्तीवाद त्या दिवशी पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी मंगळवार, 16 डिसेंबर रोजी ठेवली होती. त्यानंतर बुधवार, 17 डिसेंबर रोजी अंतिम निर्णय देत न्यायालयाने कराडचा जामीन अर्ज नामंजूर केला. ही सुनावणी न्यायमूर्ती सुशिल एम. घोडेस्वार यांच्या न्यायालयात पार पडली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलिस ठाण्यात वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांविरोधात खून तसेच मकोका कायद्याअंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 31 डिसेंबर 2024 पासून वाल्मिक कराड कोठडीत आहे.
