गंगापूर : तालुक्यातील सिध्दनाथ वाडगाव येथील गट क्रमांक १४५, १४६ व १४७ मधील राजपूत डीपीवरील तब्बल १५ विद्युत खांबाच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याने परिसरातील वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला आहे. परिणामी रब्बी हंगामातील कांदा, गहू व इतर पिके पाण्याअभावी संकटात सापडली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गंगापूर : तालुक्यातील सिध्दनाथ वाडगाव येथील गट क्रमांक १४५, १४६ व १४७ मधील राजपूत डीपीवरील तब्बल १५ विद्युत खांबाच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याने परिसरातील वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला आहे. परिणामी रब्बी हंगामातील कांदा, गहू व इतर पिके पाण्याअभावी संकटात सापडली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विद्युत खांबावरील तारा चोरीला गेल्याच्या घटनेनंतर शेतकरी नेते तथा माजी सभापती संतोष पाटील जाधव यांनी शेतकऱ्यांसह शेतातील बांधावर जाऊन पाहणी केली. चोरी गेलेल्या विद्युत तारांची सविस्तर माहिती त्यांनी महावितरण कंपनी, उपविभाग गंगापूरचे उप कार्यकारी अभियंता अरविंद काळे यांना दिली. तसेच या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनाही माहिती देत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. वीजपुरवठा बंद असल्याने सिंचन व्यवस्था ठप्प झाली असून, शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तात्काळ पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच त्वरित नवीन विद्युत तारा उपलब्ध करून वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शेतकरी नेते संतोष पाटील जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच महावितरणने याप्रकरणी तात्काळ कारवाई न केल्यास सिध्दनाथ वाडगाव यैथील शेतकरी मंगळवार, 30 डिसेंबर रोजी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी नेते संतोष पाटील जाधव यांनी दिला आहे.
