मुंबई : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.

मुंबई : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.
जिल्हा परिषदांच्या एकूण 731, तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. त्यानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीची सूचना 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध होईल. सूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी आपापल्या स्तरावर पार पाडतील. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू होईल. उमेदवारांना 21 जानेवारीपर्यंत आपली उमेदवारी दाखल करता येईल.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
नामनिर्देशन पत्र स्वीकारणे : १६ जानेवारी २०२६ ते २१ जानेवारी २०२६
नामनिर्देशन पत्राची छाननी : २२ जानेवारी २०२६
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : २७ जानेवारी २०२६ दुपारी ३ पर्यंत
अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप : २७ जानेवारी २०२६ दुपारी ३.३० नंतर
अंतिम उमेदवारांची यादी : २७ जानेवारी २०२६
मतदानाचा दिनांक : ५ फेब्रुवारी २०२६ सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत
मतमोजणी : ७ फेब्रुवारी २०२६ – सकाळी १० वाजल्यापासून
