बुलढाणा : अजाणत्या वयात पित्याचे डोक्यावरील छत्र नियतीने हिसकावून घेतले. आभाळाएव्हढ्या ‘त्या’ दु:खातून सावरत नाही तोच जन्मदेत्या आईनेही दुसरा घरठाव केला. चार चिमुकल्या अनाथ झाल्या. अशा बिकट स्थितीत वृध्द आजी त्यांचा आधार झाली.

बुलढाणा : अजाणत्या वयात पित्याचे डोक्यावरील छत्र नियतीने हिसकावून घेतले. आभाळाएव्हढ्या ‘त्या’ दु:खातून सावरत नाही तोच जन्मदेत्या आईनेही दुसरा घरठाव केला. चार चिमुकल्या अनाथ झाल्या. अशा बिकट स्थितीत वृध्द आजी त्यांचा आधार झाली.
गावातील चावडीत दहा बाय दहाच्या खोलीत आजी नातींनी कसा बसा संसार उभा केला. त्यांच्यावरील आकाशव्यापी यातनेची संवेदना ॲड. माधुरी देवानंद पवार हिचेपर्यंत पोहचताच संवेदनशील माधुरीने पुढाकार घेत त्यांच्या जीवनात माधुर्य फुलविले. कोणाही संवेदनशील माणसाच्या हृदयाला पाझर फोडणारी ही कहाणी आहे, मेहकर तालुक्यातील दुर्गम बोथा गावातील आजी नातींची!
आजीचं वय 75 वर्षे. एक नात अडीच वर्षाची, दुसरी साडेचार वर्षाची, तिसरी साडे सहा वर्षाची अन् चौथीचे वय साडे अकरा वर्षे.हक्काचा निवारा नाही, खायला अन्न नाही, पोटाची खळगी भरण्यासाठी साधन नाही, ही कल्पनाच माणसाला किती व्यथित करते. बोथा येथील प्राथमिक शिक्षक शिंगणे यांनी या कुटुंबासाठी मदतीची आर्त हाक दिली. या हाकेला प्रतिसाद म्हणून देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशन मदतीला धावून आले.या कुटुंबासाठी एक छोटसं घर उभे करण्याचा त्यांनी निश्चय केला.दुसऱ्याच दिवशी ॲड. माधुरी पवार यांनी तेथे भेट दिली आणि सर्व परिस्थिती पाहून त्या स्तंभित झाल्या.
एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये एका मोडकळीस आलेल्या घरामध्ये की जे केव्हाही पडू शकेल अश्या परिस्थितीत आपला जीव मुठीत धरून शोभाआजी आणि त्यांच्या चार नाती कशाबशा राहत होत्या. ॲड.माधुरी यांनी अवघ्या सात ते आठ दिवसांमध्ये उपलब्ध साधनसामग्रीच्या माध्यमातून त्यांच्यासाठी एक घर उभे केले.घराचे काम चालू असताना गावकऱ्यांनी मदत केली.नुसतं घर बांधून चालणार नाही तर त्या कुटुंबाची गुजरान होईल यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी दैनंदिन वापरासाठी सर्व आवश्यक साहित्य ,भांडी ,कपडे ,किराणा, बिछायत, फॅन आणि वर्षभर पुरेल एवढं अन्नधान्य या कुटुंबाला खरेदी करून दिलं.
देवानंद पवारांनी जोपासली सामाजिक बांधीलकी
काँग्रेसचे मेहकर तालुकाध्यक्ष असलेले देवानंद पवार हे नाव मेहकर मतदार संघात त्यांच्या स्मशानभूमि सौंदर्यीकरणाच्या उल्लेखनिय कार्यामुळे चिरपरिचित आहे. बोथा हे गाव घाटबोरी जिल्हा परिषद सर्कलमध्ये येते. तेथे कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता राजकारणा पलीकडे जाऊन केवळ सामाजिक बांधीलकी जोपासत देवानंद पवार यांनी अनाथांसाठी हक्काचा निवारा दिल्याने त्यांच्या या कार्याचे कौतूक होत आहे.