भोकरदन : विविध मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांनी तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात डफडे वाजवून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या गांधीगिरी आंदोलनामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दरम्यान या आदोलनाची दखल घेत उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर पाचव्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले आहे.

भोकरदन : विविध मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांनी तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात डफडे वाजवून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या गांधीगिरी आंदोलनामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दरम्यान या आदोलनाची दखल घेत उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर पाचव्या दिवशी उपोषण मागे घेण्यात आले आहे.
येथील तहसील कार्यालयासमोर मागील 5 दिवसांपासून शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कडाक्याच्या थंडीत उपोषण सुरू होते. सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे, विकास जाधव यांच्यासह शेतकरी आमरण उपोषणाला बसले होते. तहसील आणि पंचायत समिती प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दोघांची प्रकृती खालावली होती. याकडे फुलंब्री, जि.छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गेवराई पायंगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी शुक्रवार, 26 डिसेंबर रोजी तांडव आंदोलन केले. तहसील आणि पंचायत समिती कार्यालयात घुसून डफडे वाजवत प्रशासन जागे हो, जागे हो म्हणत दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर तहसील आणि पंचायत समिती प्रशासनाने मागण्या मान्य करून लेखीपत्र दिले, त्यामुळे नारायण लोखंडे, विकास जाधव यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे. सरपंच मंगेश साबळे यांनी केलेल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची जोरदार चर्चा झाली आहे.
दरम्यान, शासकीय कोणत्याही योजनेचा लाभ देण्यासाठी अधिकारी- कर्मचारी पैसे मागत असल्यास सर्वांनी एकत्र होऊन त्या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांसह युवकांनी आवाज उठवावा, असे आवाहन सरपंच मंगेश साबळे यांनी केले आहे.
