बुलढाणा : संपूर्ण भारतभूमिला समतेचा विचार देणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरा करण्याची परंपरा बुलढाणा शहराला लाभली आहे. त्याअनुषंगाने यंदा देखील बुलढाण्यातील भीमजयंती महामानवांच्या ‘ विचारांचा जागर’ ठरणार असून परिवर्तनवादी गीते, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्रबोधनात्मक व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पत्रकार निलेश राऊत यांनी दिली.

बुलढाणा : संपूर्ण भारतभूमिला समतेचा विचार देणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरा करण्याची परंपरा बुलढाणा शहराला लाभली आहे. त्याअनुषंगाने यंदा देखील बुलढाण्यातील भीमजयंती महामानवांच्या ‘ विचारांचा जागर’ ठरणार असून परिवर्तनवादी गीते, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्रबोधनात्मक व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पत्रकार निलेश राऊत यांनी दिली.
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तिक जयंती ‘समता पर्व’ म्हणून साजरा केली जाते. यानिमित्त दरवर्षी, विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते. त्यानुसार, यंदाही विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात, बुधवारी दुपारी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली. याप्रसंगी, अध्यक्ष राऊत म्हणाले, यंदा संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेषतः सामान्य ज्ञान परीक्षा होणार आहे. १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता स्थानिक त्रिशरण चौकस्थित सामाजिक न्याय भवन येथे ही परीक्षा पार पडणार आहे. यानंतर उपरोक्त ठिकाणीच, दुपारी १२ वाजता पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, सीआरपीएफ असिस्टंट कमांडर मोनिका साळवे, भारत विद्यालयाचे अरविंद पवार हे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन करतील. त्यानंतर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गांधी भवन प्रांगणात शुक्रवार, ११ एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांचा परिवर्तनवादी गीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. तर, १२ एप्रिल रोजी ज्येष्ठ संपादक तथा विचारवंत ज्ञानेश महाराज यांचे व्याख्यान होणार आहे. १३ एप्रिल रोजी गायक अजय देहाडे यांचा ‘तुफानातील दिवे’ भीम गीतांचा कार्यक्रम पार पडेल. असे तीनही कार्यक्रम शहरातील गांधीभवनाच्या प्रांगणात पार पडतील. तमाम शहरवासीयांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.
मानवंदना आणि शोभायात्रा..
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अर्थात १४ एप्रिलला सकाळी ८ वाजता महिलांची दुचाकी रॅली निघणार असून ९ वाजता समता सैनिक दल, महार रेजिमेंट, मराठा रेजिमेंट, यशसिद्धी सैनिक सेवा संघ, जिल्हा पोलीस वाद्यपथक हे वाद्यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मानवंदना देणार आहेत. त्यानंतर, सायंकाळी डोळ्यांचे पारणे फेडणारी शोभायात्रा निघणार आहे.