रिसोड : शहरात सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे सोमवारी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते लोणी फाटा परिसरातील पुंडलिकराव गवळी चौकदरम्यान नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. मात्र या कारवाईविरोधात अतिक्रमणधारकांनी आक्रमक भूमिका घेत रास्तारोको आंदोलन केले.

रिसोड : शहरात सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे सोमवारी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते लोणी फाटा परिसरातील पुंडलिकराव गवळी चौकदरम्यान नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. मात्र या कारवाईविरोधात अतिक्रमणधारकांनी आक्रमक भूमिका घेत रास्तारोको आंदोलन केले.
गोरगरीब फळ व भाजीपाला विक्रेत्यांवर अन्यायकारक कारवाई केली जात असल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रशासनाला जाब विचारला. परिस्थिती तणावपूर्ण होताच ठाणेदार रामेश्वर चव्हाण तसेच नगरपरिषद अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलकांशी चर्चा केली. या वेळी पोलिस व आंदोलकांमध्ये काही काळ शाब्दिक चकमकही झाल्याचे पाहावयास मिळाले. आंदोलकांची आक्रमक भूमिका लक्षात घेता अतिक्रमण हटविण्यासाठी आणलेले जेसीबी व ट्रॅक्टर प्रशासनाने परत पाठविले. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर आंदोलकांनी रिसोड नगर परिषद गाठत तेथेही ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी आपले हातगाडे रस्त्याच्यामध्ये न लावता कडेला लावावे, अशा सूचना पोलिस आणि नगरपरिषद प्रशासनाने आंदोलकांना केली, त्यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आंदोलकांनी सांगितले.
