खामगाव : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमधील महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीचा निकाल 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहिर करण्यात आला आहे. जाहिर झालेल्या इयत्ता 12 वीच्या निकालात राज्यासह बुलढाणा जिल्ह्यातही मुलींनीच बाजी मारली आहे.

अनुप गवळी / खामगाव : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमधील महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीचा निकाल 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहिर करण्यात आला आहे. जाहिर झालेल्या इयत्ता 12 वीच्या निकालात राज्यासह बुलढाणा जिल्ह्यातही मुलींनीच बाजी मारली आहे. तर जिल्ह्यातील तालुकानुसार जाहिर झालेल्या निकालात 98.41 टक्के निकाल घेवून मेहकर तालुका अव्वल ठरला असून घाटाखालील डोंगराळ भागात वसलेला आदिवासी बहूल तालुका म्हणून ओळखला जाणारा संग्रामपूर तालुक्याने 98.38 टक्के निकाल प्राप्त करून दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. तसेच जिल्ह्यात सर्वात कमी निकाल मलकापूर तालुक्याचा घोषित झाला असून मलकापूर तालुक्याचा 88.43 इतका निकाल लागला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, मलकापूर आणि नांदुरा या सहा तालुक्यामधून एकुण 12 हजार 849 विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परिक्षेसाठी अर्ज भरले होते. यापैकी 12 हजार 801 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. यापैकी 11 हजार 927 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 5 हजार 911 मुलांचा तर 6016 उत्तीर्ण मुलींचा समावेश आहे. मागील वर्षी लागलेल्या निकालातही जिल्ह्यातील अनेक शाळांचा शंभर टक्के निकाल लागला होता. यंदाही अनेक शाळांचा शंभर टक्के निकालात सहभाग आहे. अनेक शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. परंतु जिल्ह्याच्या निकालात यंदा मलकापूर तालुक्याचा शैक्षणिक स्तर खालावल्याचे दिसून आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात मलकापूर तालुक्याचा निकाल हा फक्त 88.43 इतका कमी लागला आहे.
अशी आहे तालुका निकाह आकडेवारी
खामगाव तालुक्यातील एकुण 3929 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यापैकी 3651 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून खामगाव तालुक्याचा 92.92 टक्के निकाल लागला आहे. तसेच शेगाव तालुक्यातील एकुण 1681 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यापैकी 1568 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शेगाव तालुक्याचा 93.27 टक्के निकाल लागला आहे. याचबरोबर नांदुरा तालुक्यातील 1672 विद्यार्थ्यांपैकी 1546 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून नांदुरा तालुक्याचा 92.46 टक्के निकाल घोषित झाला आहे. याचबरोबर संग्रामपूर तालुक्याने जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकावला असून संग्रामपूर तालुक्यातील 1546 विद्यार्थ्यांपैकी 1521 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा 98.38 टक्के निकाल जाहिर झाला आहे. जळगाव जामोद तालुक्यातून 1758 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यापैकी 1683 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याचा 95.73 टक्के निकाल लागला आहे. सर्वात कमी मलकापूर तालुक्याचा निकाल घोषित झाला असून तालुक्यातून 2215 विद्यार्थ्यांपैकी 1958 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे मलकापूर तालुक्याचा निकाल 88.43 टक्के आला आहे.
घाटाखालीही निकालात मुलीच पुढे
5 मे रोजी जाहिर झालेल्या इयत्ता बारावीच्या निकालातही राज्यासह जिल्ह्यातही मुलींनीच बाजी मारली आहे. यंदाच्या निकालात घाटाखालील 6 तालुक्यांमध्येही मुलीच पुढे असून घाटाखालील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 5 हजार 911 इतकी असून 6016 उत्तीर्ण विद्यार्थींनींचा समावेश आहे. त्यामुळे बारावीच्या निकालातही मुलींनी निकालात उत्तुंग भरारी घेतली आहे.