वाशिम : गावपातळीवरील विकासकामांना गती देणारा मोठा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला असून, पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन २०२५–२६ या चालू आर्थिक वर्षातील अबंधित निधीचा पहिला हप्ता राज्य शासनाला वितरीत करण्यात आला आहे. त्यानुषंगाने राज्याच्या ग्रामविकास विभागाने वाशिम जिल्ह्यातील तब्बल ४९१ ग्रामपंचायतींना एकूण ११६ कोटी ८ लाख ४८ हजार ३३९ रुपये इतका निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध होणार आहे.

वाशिम : गावपातळीवरील विकासकामांना गती देणारा मोठा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला असून, पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन २०२५–२६ या चालू आर्थिक वर्षातील अबंधित निधीचा पहिला हप्ता राज्य शासनाला वितरीत करण्यात आला आहे. त्यानुषंगाने राज्याच्या ग्रामविकास विभागाने वाशिम जिल्ह्यातील तब्बल ४९१ ग्रामपंचायतींना एकूण ११६ कोटी ८ लाख ४८ हजार ३३९ रुपये इतका निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध होणार आहे.
१५व्या वित्त आयोगाच्या तरतुदीनुसार एकूण निधीपैकी ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना दिला जातो, तर उर्वरित १०–१० टक्के निधी जिल्हा परिषद व पंचायत समितींना वितरीत केला जातो. ग्रामपंचायतींना निधी लोकसंख्येच्या प्रमाणात मिळत असल्याने प्रत्येक गावाच्या गरजेनुसार विकासकामांचे नियोजन करणे शक्य होत आहे. पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, आरोग्य व इतर मूलभूत गरजांसाठी हा निधी उपयुक्त ठरणार आहे.
गावातील सध्याची परिस्थिती, स्थानिक समस्या आणि गरजांचे विश्लेषण करून विकासकामांची निवड करण्याचे अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. त्यामुळे ‘गावाची गरज – गावाचाच निर्णय’ या तत्त्वावर विकासकामे राबवली जाणार आहेत. शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर कार्यालयीन तीन दिवसांत ग्रामपंचायतींच्या खात्यात निधी वर्ग करण्याचे आदेश देण्यात आल्याने निधी वितरणाची प्रक्रिया जलद होणार आहे.
