करमाड : येथील न्यू हायस्कूलमध्ये तब्बल ३८ वर्षे सेवेत राहून विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी जपणारे निवृत्त शिक्षक दत्तात्रय अंबादासराव राऊत (वय ७५) यांचे अल्प आजाराने गुरुवारी (दि.१३) निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी मोठ्या भगिनी प्रयागबाई राधाकृष्ण जाधव (वय ८२, रा. आनंदस्वामी मंदिरामागे, जालना) यांना कळताच त्यांनीही भावाच्या विरह सहन न झाल्याने प्राण त्यागला. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

करमाड : येथील न्यू हायस्कूलमध्ये तब्बल ३८ वर्षे सेवेत राहून विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी जपणारे निवृत्त शिक्षक दत्तात्रय अंबादासराव राऊत (वय ७५) यांचे अल्प आजाराने गुरुवारी (दि.१३) निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी मोठ्या भगिनी प्रयागबाई राधाकृष्ण जाधव (वय ८२, रा. आनंदस्वामी मंदिरामागे, जालना) यांना कळताच त्यांनीही भावाच्या विरह सहन न झाल्याने प्राण त्यागला. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.
३८ वर्षे एकनिष्ठ सेवा
दत्तात्रय राऊत यांनी न्यू हायस्कूल, करमाड येथे सुरुवातीपासून ते निवृत्तीपर्यंत सलग ३८ वर्षे अध्यापन सेवा बजावली. विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा परिसरात मोठा सन्मान होता. गेल्या दीड वर्षांपासून ते पोटाच्या विकारांनी त्रस्त होते. विविध ठिकाणी उपचार करूनही तब्येत सुधारली नाही आणि गुरुवारी करमाड येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भावाच्या निधनाने भगिनी झाली व्यथित
दत्तात्रय राऊत यांच्या निधनाची बातमी जालना येथे राहणाऱ्या त्यांच्या मोठ्या भगिनी प्रयागबाई जाधव यांना मिळताच त्या अत्यंत व्यथित झाल्या. भावाच्या विरहाचा खोल मानसिक धक्का बसल्याने त्यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांच्या मुलगा लक्ष्मीकांत आणि नातू मंगेश यांनी तातडीने त्यांना जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
करमाड–जालना येथे अंत्यसंस्कार; ग्रामस्थांत हळहळ
एकाच दिवशी भाऊ–बहिणीचे अशा वेदनादायी परिस्थितीत निधन झाल्याने करमाड आणि जालना येथे नातेवाईक, मित्र–परिवार आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली. करमाड आणि जालना येथे दोघांचेही अंत्यसंस्कार करण्यात आले. नातलगांसह गावकऱ्यांनी या दुःखद प्रसंगावर हळहळ व्यक्त केली.
