बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा नविन बायपास वाय-पॉइंट नजीक राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील एक महिला व एक पुरुष अशा दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर अन्य पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा नविन बायपास वाय-पॉइंट नजीक राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील एक महिला व एक पुरुष अशा दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर अन्य पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.
मृतांमध्ये खुशरंग भिलुजी मायवाड (वय ५०) आणि अनिता खुशरंग मायवाड (वय ४८, रा. बैतुल, मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये मोनू मुरली हारोळे, शिवा मुरली हारोळे, रोहित खुशरंग मायवाड, बामी मायवाड आदींचा समावेश असून त्यांच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकहून बैतुल (मध्यप्रदेश)कडे परतताना एमपी ४८ झेडएच ४८२२ क्रमांकाच्या कारमधून एकूण सात प्रवासी प्रवास करत होते. वाशिंबा नविन बायपास वाय-पॉइंटजवळ कारच्या डाव्या बाजूचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला सुमारे दहा फूट खोल दरीत उलटली. अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे उलटून पडली.
अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतात काम करत असलेले सामाजिक कार्यकर्ते गजानन देशमुख, गजानन तिडके, नितीन बोपुलकर तसेच इतर शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. यानंतर पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रमोद डोईफोडे, किशोर सोलंके, शुभम फलके, ज्ञानेश्वर जामोदे यांनी घटनास्थळी पोहोचून पलटी झालेल्या कारमधून जखमींना बाहेर काढले व उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ, पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजू पोलिस करीत आहेत.
