बुलढाणा : शहरानजिक असलेल्या सागवन भागात दोन पिलासह बिबट्या आढळून आल्याने परिसरातील ग्रामस्थांसह शेतात पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

बुलढाणा : शहरानजिक असलेल्या सागवन भागात दोन पिलासह बिबट्या आढळून आल्याने परिसरातील ग्रामस्थांसह शेतात पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
वन्य प्राण्यांचा अधिवास असलेल्या जंगलामध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्याने वन्यप्राणी अन्नाच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. राज्यात
बिबट्यांची संख्या पाच हजार असल्याचे शासकीय आकडेवारी सांगत असलीतरी अनेक ठिकाणी बिबट्यांचा शिरकाव दिसून येत असल्याने ही संख्या त्याहून अधिक असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनातही बिबट्यांचा विषय चांगलाच गाजत आहे. बुलढाणा शहराच्या जवळ असलेल्या सागवन भागात 12 डिसेंबरच्या सायंकाळी सागवन येथील शेतकरी अशोक ग्यानबा जाधव यांच्या शेतात दोन बछडयासह बिबट्या आढळून आला. 13 डिसेंबर रोजी सकाळी पुन्हा अशोक काळवाघे यांच्या शेतातून बिबट्या गेल्याचे दिसून आले. यंदा तूर व मका पीकाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळत असल्याने शेतांमध्ये बिबट्यांचा शिरकाव वाढू लागला आहे. रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी शेतात जावे लागते. बिबट्या दिसून आल्याने आता शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
