वाशिम : गोर बंजारा समाजाला एसटी दर्जाचे आरक्षण मिळावे, हैदराबाद गॅझेट लागू करून सेवा-सवलती उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी गुरुवारी दुपारच्या सुमारास विविध भागांमधून हजारोंच्या संख्येने आंदोलक समृद्धी महामार्गावर उतरले. संत सेवालाल आणि याडी मरियामाला भोग लावून समाजबांधवांनी जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन करत शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

वाशिम : गोर बंजारा समाजाला एसटी दर्जाचे आरक्षण मिळावे, हैदराबाद गॅझेट लागू करून सेवा-सवलती उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी गुरुवारी दुपारच्या सुमारास विविध भागांमधून हजारोंच्या संख्येने आंदोलक समृद्धी महामार्गावर उतरले. संत सेवालाल आणि याडी मरियामाला भोग लावून समाजबांधवांनी जवळपास एक तास रास्ता रोको आंदोलन करत शासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.
पोहरागडचे महंत कबीरदास महाराज यांच्या आरदास प्रार्थनेने आंदोलनाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रा. संदेश चव्हाण, महंत संजय महाराज, प्रा. डॉ. अनिल राठोड, जानू महाराज, नामा बंजारा, राजू रत्ने, कांतीलाल नायक आदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने गोर बंजारा समाजबांधव एकवटले. सुरुवातीला पोलिसांनी प्रा. संदेश चव्हाण यांना वारंगी फाट्यावर जवळपास दोन तास थांबवले, मात्र आंदोलकांच्या संतापाचा भडका उडताच त्यांनी पोलिस बंदोबस्ताचे कठडे तोडून समृद्धी महामार्गाकडे धाव घेतली. काही वेळातच हैदराबाद-अकोला महामार्गावरील आंदोलकही समृद्धी महामार्गावर जमा झाले आणि जवळपास एक तास ठिय्या मांडून आंदोलन केले. . संदेश चव्हाण म्हणाले, “गेल्या महिनाभरात पंचावन्न महामोर्चे काढले, नऊ ठिकाणी आमरण उपोषण झाले, चार युवकांनी आत्महत्या केल्या, तरीही शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. गोर बंजारा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये; यानंतर रेल रोको, साखळी उपोषण आणि हिवाळी अधिवेशनावेळी नागपूरला लाखो समाजबांधव उतरतील.”
पाच हजाराहून अधिक समाजबांधव सहभागी
या आंदोलनात वाशिम जिल्ह्यासह अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांहून अधिक गोर बंजारा समाजबांधवांनी सहभाग घेतला. महामार्गावरील वाहतूक जवळपास तासभर ठप्प राहिली. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. अखेर पोलीस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलनकर्त्यांनी महामार्ग खुला करून आंदोलन मागे घेतले.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
गोर बंजारा समाजाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी समृद्धी महामार्गावर तगडा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन वाशिम मार्गे समृद्धी महामार्गावर जाणारी वाहतूक काही काळासाठी रोखण्यात आली होती. या दरम्यान वाहनचालकांना काहीशी अडचण निर्माण झाली, मात्र प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.
