राज्यात मुसळधार पाऊस: कुठे पूर, कुठे अतिवृष्टी; सात जणांचा मृत्यू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

मुंबई : राज्यभरात धुवाधार पाऊस सुरू आहे. मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नवी मुंबई आणि ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. तर मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : राज्यभरात धुवाधार पाऊस सुरू आहे. मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नवी मुंबई आणि ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. तर मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिकच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमिवर सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.

रत्नागिरी, रायगड आणि हिंगोली जिल्ह्यांत अधिक पाऊस झाला असून, हवामान खात्याने 17 ते 21 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मागील दोन दिवसांत राज्यात विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. कोकणातील काही नद्यांनी धोकापातळी ओलांडली असून जळगावमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अलमट्टीबाबत कर्नाटक सरकारशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून, सध्या धोका नसला तरी यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले. मुखेडमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून, विष्णुपुरीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलेल्या सूचनांमध्ये, एसएमएस ॲलर्ट पाठवताना वेळेचा अचूक उल्लेख करावा, येणारे अलर्ट गांभीर्याने घ्यावेत, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. तातडीच्या मदतीसाठी मंत्रालय गाठण्याची गरज नाही, स्थानिक पातळीवरच निधी व अधिकार देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगर विभागात 800 गावे बाधित

छत्रपती संभाजीनगर विभागातील 800 गावे बाधित झाली आहेत. दक्षिण गडचिरोलीत प्रशासन सतर्क आहे. मुंबईसह ठाणे आणि कोकणात पुढील 48 तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, चांदूररेल्वे, मेहकर, वाशिम येथे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विदर्भात प्राथमिक अंदाजानुसार दोन लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. 

मुंबईत आठ तासांत 170 मिमी पाऊस

मुंबईत सोमवारी सकाळपासून अवघ्या आठ तासांत 170 मिमी पाऊस झाला आहे. शहरात पाणी तुंबल्यामुळे दोन ठिकाणी वाहतूक प्रभावित झाली. रेल्वे, मेट्रो व इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे. पुढील 10 ते 12 तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे असून, प्रशासनाने काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. उद्याच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शाळांना सुटी जाहीर करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासन व महापालिकांना देण्यात आला आहे.

शाळांना सुट्टी जाहीर

खबरदारीच्या पार्श्वभूमी ठाणे, नवी मुंबई आणि बुलढाण्यात बुधवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बुलढाण्यातील चिखली आणि मेहकर तालुक्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. त्यामुळे फक्त या दोन तालुक्यातील शाळा बंद राहणार आहेत. दरम्यान पावसाचे अलर्ट लक्षात घेऊन उद्या शाळांना सुट्टी देण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात सैन्य दलाला पाचारण 

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. त्यामुळे मदत कार्यासाठी सैन्य दलाला पाचारण करण्यात आले आहे. विशेषतः मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सुमारे 206 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन प्रभावित झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.

पुरामुळे 50 म्हशींचा मृत्यू 

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात पुराच्या पाण्यात गोठ्यात बांधलेल्या 50 म्हशींचा मृत्यू झाला आहे. शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. एका म्हशीची किंमत लाखभर असते, 50 म्हशींचे बलिदान म्हणजे किमान 70 लाखांचे नुकसान.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »