मानोरा : बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला रविवारी नाट्यमय वळण मिळाले. रमेश पवार, सुरेश राठोड व सतीश पवार यांनी डॉ. रामरावबापू महाराज यांच्या मंदिरावर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज, शेखर महाराज व भक्तराज महाराज यांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर सुमारे तासाभराने आंदोलक खाली उतरले.

शासनाच्या पत्रानंतर पोहरादेतील उपोषणाची सांगता
मानोरा : बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला रविवारी नाट्यमय वळण मिळाले. रमेश पवार, सुरेश राठोड व सतीश पवार यांनी डॉ. रामरावबापू महाराज यांच्या मंदिरावर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज, शेखर महाराज व भक्तराज महाराज यांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर सुमारे तासाभराने आंदोलक खाली उतरले.
यानंतर नायब तहसीलदार उमेश बनसोड यांनी शासनाच्या वतीने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे २० सप्टेंबरचे पत्र वाचून दाखविले. बंजारा समाजाच्या मागण्यांसंदर्भात गठीत समितीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, उर्वरित सुनावणी, कागदपत्रांची छाननी व माहिती संकलन करून अंतिम अहवाल शासनाला सादर केला जाणार असल्याचे पत्रात नमूद आहे.
शासनाच्या पत्रानंतर धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज व नायब तहसीलदार उमेश बनसोड यांच्या हस्ते आंदोलकांना लिंबूपाणी देऊन उपोषणाची तूर्त सांगता करण्यात आली. दरम्यान, पुढील पंधरा दिवसांत मुख्यमंत्री यांच्यासोबत आंदोलकांची बैठक घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे बाबुसिंग महाराज यांनी सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास दिल्ली येथे जाऊन उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
उपोषणाची सांगता झाल्यानंतर काही आंदोलकांना वैद्यकीय तपासणीसाठी मानोरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. आता ३१ डिसेंबरपर्यंत समितीच्या अहवालाकडे समाजाचे लक्ष लागले आहे.


