राजेंद्र दाते यांच्या उपोषणाचा तेरावा दिवस; मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
‘विभागीय आयुक्त किंवा अप्पर आयुक्तांनी दाते यांच्या मागण्यांवर चर्चा करणे अपेक्षित आहे. कायदेशीर आणि शाश्वत आरक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे,’ असे डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर : शाश्वत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते यांचे विभागीय आयुक्तालयासमोर सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन शुक्रवारी तेराव्या दिवशीही सुरू राहिले. शासनाने दाते यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपोषणस्थळी ‘ जागरण गोंधळ ’ घालून सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
65 वषय दाते हे 9 ऑगस्टपासून उपोषणावर आहेत. तेरा दिवस उलटूनही राज्य मंत्रिमंडळाने दखल घेतली नसल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला. दाते यांची प्रकृती ढासळत असल्याचा दावाही पदाधिकाऱ्यांनी केला. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मागण्यांबाबत विचारणा केली नसल्याचा आरोप करण्यात आला.

‘विभागीय आयुक्त किंवा अप्पर आयुक्तांनी दाते यांच्या मागण्यांवर चर्चा करणे अपेक्षित आहे. कायदेशीर आणि शाश्वत आरक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे,’ असे डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले. विखे पाटील यांनी शुक्रवारी रात्री भेटीचा निरोप दिला होता; मात्र ते आले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी योगेश शेळके, बापूसाहेब शिरसाट, विजय काकडे, माणिकराव शिंदे, सुनील कोटकर आदी उपस्थित होते.
दाते यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राजकीय आरक्षण वगळता ओबीसीप्रमाणे सवलती देणे, हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्राबाबत भूमिका स्पष्ट करणे, एसईबीसीला ओबीसीप्रमाणे सुविधा देणे आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे यांचा समावेश आहे. या मागण्यांवर शासनस्तरावर अद्याप ठोस चर्चा न झाल्याने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
रमेश पाटील यांचा गोंधळ..

शाश्वत मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे राजेंद्र दाते पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक रमेश पाटील यांच्यात विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील उपोषणस्थळी शाब्दिक खडाजंगी झाली. मराठा म्हणून उपोषणकर्ते दाते पाटील यांना भेटण्यासाठी आलो होतो; मात्र त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप रमेश पाटील यांनी केला. दरम्यान, दाते पाटील यांच्या समर्थकांनी रमेश पाटील यांच्या भूमिकेवर टीका केली. रमेश पाटील हे स्वतःला मराठा सांगत असले तरी आमच्या आंदोलनात अडथळा आणत असल्याचा आरोप केला. एका महिला समर्थक पाटील यांना जरांगे यांचे पिल्लू म्हणून हिणवले…दोन्ही बाजू समोरासमोर आल्यानंतर काही सहकाऱ्यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर रमेश पाटील यांना घटनास्थळावरून बाहेर नेण्यात आले. या प्रकारामुळे काही काळ उपोषणस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.

