छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खवड्या डोंगरावरील हृदयद्रावक घटना
तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी जवळपास तीन तास कुणालशी संवाद साधून त्याला परिस्थितीतून बाहेर आणण्याचे प्रयत्न सुरू होते. विविध प्रकारे त्याचे लक्ष दुसरीकडे वळवून त्याला खाली आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो अत्यंत अस्वस्थ अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. शेवटच्या टप्प्यात वडील मुरलीधर मुलाजवळ गेले. त्याला सुरक्षितपणे मागे आणण्याच्या प्रयत्नात दोघांचा तोल गेला आणि ते दरीत कोसळले.

छत्रपती संभाजीनगर : तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवार, 21 ऑगस्ट रोजी एकाच कुटुंबावर काळाचा घाला घालणारी हृदयद्रावक घटना घडली. १८ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा दरीत कोसळून मृत्यू झाला. या घटनेने धक्का बसलेल्या आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सातारा-देवळाई परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
देवळाई-सातारा परिसरातील रहिवासी कुणाल मुरलीधर चांदवडे हा तरुण सकाळी खवड्या डोंगरावर गेल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. तो संकटात असल्याचे समजताच त्याचे वडील मुरलीधर चांदवडे, आई संगीता चांदवडे तसेच परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी पोहोचले. नागरिकांनी त्याची समजूत काढत त्याला सुरक्षित ठिकाणी आणण्याचे प्रयत्न केले.
तिसगावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी जवळपास तीन तास कुणालशी संवाद साधून त्याला परिस्थितीतून बाहेर आणण्याचे प्रयत्न सुरू होते. विविध प्रकारे त्याचे लक्ष दुसरीकडे वळवून त्याला खाली आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो अत्यंत अस्वस्थ अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. शेवटच्या टप्प्यात वडील मुरलीधर मुलाजवळ गेले. त्याला सुरक्षितपणे मागे आणण्याच्या प्रयत्नात दोघांचा तोल गेला आणि ते दरीत कोसळले. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.
आईचाही दुर्दैवी अंत
पती आणि मुलासोबत घडलेली दुर्घटना डोळ्यांसमोर पाहिल्यानंतर संगीता यांना मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्यांनीही खोल दरीत उडी घेतली आणि त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. उपस्थित नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली.
कणालने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न का केला, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी आणि संबंधित परिस्थितीची माहिती घेतली जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या कथनाने काळजाचा ठोका चुकलाघटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मदतीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यानंतर घडलेली दुर्घटना अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगितले. अवघ्या काही वेळात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

