खामगाव : भारताला 2047 पर्यंत विश्वगुरू बनवण्यासाठी संपूर्ण समाजाचे एकबळ आणि संघटित प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे बुलढाणा जिल्ह्याच्या दोन दिवसीय शेगाव आणि खामगाव दौऱ्यावर असून या दरम्यान विविध बैठका व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

खामगाव येथे अत्याधुनिक क्रीडा संकुल व बंदिस्त सभागृहाचे सरसंघचालकांच्या हस्ते उद्घाटन
अनुप गवळी | खामगाव : भारताला 2047 पर्यंत विश्वगुरू बनवण्यासाठी संपूर्ण समाजाचे एकबळ आणि संघटित प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे बुलढाणा जिल्ह्याच्या दोन दिवसीय शेगाव आणि खामगाव दौऱ्यावर असून या दरम्यान विविध बैठका व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान खामगाव येथील ऋषी संकुल परिसरातील सूर्योदय पारधी समाज आश्रमशाळेत अमनोरा येस फाउंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक क्रीडा संकुल व नवीन बंदिस्त सभागृहाचे उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. सूर्योदय पारधी समाज आश्रमशाळा आणि अमनोरा येस फाउंडेशनतर्फे आदिवासी व वंचित बांधवांच्या हितासाठी सुरू असलेल्या या कार्याचे कौतुक करत, सर्व नागरिकांनी अशा सामाजिक उपक्रमांना मदत करून त्यांच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहनही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी केले. या समारंभाला मंचावर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, सिटी कार्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिरुद्ध देशपांडे, श्री सद्गुरू धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदौरच्या विश्वस्त डॉ. आयुषी देशमुख तसेच माजी विधानपरिषद विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, आमदार डॉ. संजय कुटे, आ. श्वेता महाले, खामगाव नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर, शिवसेना उबाठा नेते जालिंधर बुधवंत आदि उपस्थित होते. यावेळी कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांनी सुर्योदय पारधी समाज आश्रम शाळेतील कार्याचे कौतुक करत शाळेच्या विकासासाठी जे काही प्रयत्न करावे लागतीत ते करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे म्हणाले. तसेच आदीवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कुटुंब हीच आपल्या समाजव्यवस्थेची खरी ताकद
आपल्या भाषणात सरसंघचालक म्हणाले की, भारताची संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या समाजव्यवस्थेत एकटा मनुष्य हे युनिट नसून कुटुंब हे खरे युनिट आहे. भविष्यात समाजात कसे जगायचे, कसे वागायचे आणि परंपरांमधील कालसुसंगत मूल्यांचे व कायद्याचे पालन कसे करायचे, याचे संस्कार मनुष्याला कुटुंबातूनच मिळतात. समाजाची सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बांधणी करणारा मुख्य पाया कुटुंबच आहे.
वंचित व आदिवासी बांधवांना सोबत घेणे आपले कर्तव्य
परकीय पारतंत्र्यामुळे आपल्याच लोकांमधील परस्पर संपर्क तुटला आणि काही घटक अपरिचित राहिले, याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, ङ्गङ्घआपले आदिवासी बांधवही संपर्काअभावी आपल्यापासून काहीसे अपरिचित राहिले. प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांनी शोधलेले शाश्वत सत्य आणि वसुधैव कुटुंबकम्ची भावना सर्वांपर्यंत पोहोचवणे हे एका व्यक्तीचे काम नसून संपूर्ण राष्ट्राचे कर्तव्य आहे. सर्व आदिवासी व वंचित बांधव आपल्याच समाजाचा एक भाग आहेत, त्यांना सोबत घेऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे आपले दायित्व आहे.