फुलंब्री : जल जीवन मिशन योजनेअंतर्गत वाघोळा गावात करण्यात आलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात विकास पाटील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वाघोळा ग्रामस्थांनी जातेगाव सिंचन तलाव येथे जलसमाधी आंदोलन छेडले आहे. मात्र प्रशासनाने पाईपलाईन हायड्रा टेस्टिंगच्या गणुवत्तेची चौकशी करण्याचे अश्वासन दिल्यानंतर आ. अनुराधा चव्हाण यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

दोषींवर कारवाई करण्याचे प्रशासनाने दिले आश्वासन : आ.अनुराधा चव्हाण यांची मध्यस्थी
फुलंब्री : जल जीवन मिशन योजनेअंतर्गत वाघोळा गावात करण्यात आलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात विकास पाटील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वाघोळा ग्रामस्थांनी जातेगाव सिंचन तलाव येथे जलसमाधी आंदोलन छेडले आहे. मात्र प्रशासनाने पाईपलाईन हायड्रा टेस्टिंगच्या गणुवत्तेची चौकशी करण्याचे अश्वासन दिल्यानंतर आ. अनुराधा चव्हाण यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
फुलंब्री तालुक्यातील वाघोळा येथे करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. या आंदोलनात गावातील हजारो नागरिक सहभागी होत असतांना आंदोलनाची तीव्र्रता लक्षात घेवून आ. अनुराधा चव्हाण यांनी मध्यस्थी करीत प्रशासनाशी संपर्क साधला त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. वारे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून घेतल्या व काही महत्त्वपूर्ण आश्वासने दिली.
यामध्ये निकृष्ट दर्जाच्या पाईपलाईनची दोन दिवसांच्या आत हायड्रा टेस्टिंग करण्यात येईल. झालेल्या कामाच्या गुणवत्तेची चार दिवसांत संपूर्ण तांत्रिक तपासणी केली जाईल. संबंधित ठेकेदार किंवा अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. नवीन पाईपलाईनचे काम संबंधित ठेकेदाराकडूनच करून घेतले जाईल. वाघोळा ग्रामस्थांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील आदी मुद्यांवा समावेश आहे.
—
लवकरच कामाची चौकशी
गावकऱ्यांनी विकास पाटील गायकवाड यांच्या नेतृत्वात या कामाची चौकशी करण्यात यावे या संदर्भातील निवेदन पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यावर कार्यकारी अभियंता श्री. वारे यांनी ग्रामस्थांना उद्याच पाईपलाईनची हायड्रा टेस्टिंग करून तिची गुणवत्ता तपासण्यात येणार असल्याचे स्पष्ट सांगितले. त्यांच्या या आश्वासनानंतर आणि आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. वारे, उपअभियंता श्री. वाघ, उपअभियंता श्री. काटकर, उपअभियंता श्री. शेळके, श्री.काकडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. नवघरे, श्री. चाटे, श्री. कणसे, अग्निशमन विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
—
पाणी प्रश्नावर तडजोड नाही
“वाघोळा ग्रामस्थांच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही तर ग्रामस्थ पुन्हा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे प्रशासनाला तातडीने दखल घ्यावी लागली आहे. वाघोळा गावाच्या पाणीप्रश्नाच्या समाधानासाठी आता प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईल अशी अपेक्षा आहे. ”
– विकास पाटील गायकवाड, आंदोलक, वाघोळा


