मेडशी :वाशिम-अकोला राष्ट्रीय महामार्गावरील मेडशी बायपास परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवार, १६ मे रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजता सरपंच हॉटेलसमोरील बायपासजवळ घडली.

मेडशी :वाशिम-अकोला राष्ट्रीय महामार्गावरील मेडशी बायपास परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवार, १६ मे रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजता सरपंच हॉटेलसमोरील बायपासजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक एमएच ०४ एयू १७६० हा वाशिमकडून अकोल्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना दुचाकी क्रमांक एमएच २८ एसी ४८३७ ला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील सत्तारखॉ अलीयारखॉ पठाण (वय ३५) यांचा मृत्यू झाला, तर पुरुषोत्तम उर्फ बबन पंजाब राऊत (वय ३२) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. दोघांनाही तातडीने रुग्णवाहिकेद्वारे अकोल्याला हलविण्यात आले.
दरम्यान, मेडशी बायपास परिसरात सातत्याने अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या ठिकाणी अंडरपास, गतिरोधक व अन्य सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून अनेकदा करण्यात आली आहे. यासाठी रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते; मात्र संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत या बायपासवर सात ते आठ निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून दोन डझनहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. ‘आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
पातूर घाटाप्रमाणे प्रभावी गतिरोधक उभारणे, वेगमर्यादा नियंत्रण आणि कायमस्वरूपी सुरक्षा उपाय तातडीने राबविण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.


