कोलकाता : भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात एक ऐतिहासिक वळण आले आणि भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यात प्रथमच सत्ता मिळवली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच, ऐतिहासिक ब्रिगेड परेड मैदानावर भाजप सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला.

कोलकाता : भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात एक ऐतिहासिक वळण आले आणि भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यात प्रथमच सत्ता मिळवली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच, ऐतिहासिक ब्रिगेड परेड मैदानावर भाजप सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला.
या शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. ‘जय श्री राम’च्या घोषणा, ढोल-ताशांचा गजर आणि फडकत असलेल्या भगव्या ध्वजांच्या गजरात सुवेंदू अधिकारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंचावर आल्यावर पंतप्रधान मोदींनी जनादेशाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी लोकांसमोर मंचावर नतमस्तक झाले. या ऐतिहासिक ठिकाणी जमलेल्या हजारो भाजप समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत विजय मिळवून भाजपच्या आक्रमक निवडणूक प्रचाराचा चेहरा बनलेले सुवेंदू अधिकारी हे शपथ घेणारे पहिले व्यक्ती होते.
पाच आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
15 वर्षानंतर पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल झाला असून भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासोबतच सध्या पाच मंत्र्यांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळानेही शपथ घेतली. भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही मतदारसंघांतून विजयी झालेले अधिकारी यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी शपथ घेतली. यानंतर भाजपचे आमदार अग्निमित्र पॉल, अशोक कीर्तनिया, क्षुदिराम टुडू आणि निशीथ प्रमाणिक यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.


