नवी दिल्ली : आम आदमी पक्षात (आप) फूट पडली आहे. आपचे खासदार राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राघव चड्ढा यांच्यासह खासदार संदीप पाठक आणि खासदार अशोक मित्तल यांनी देखील भाजपत प्रवेश केला.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षात (आप) फूट पडली आहे. आपचे खासदार राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राघव चड्ढा यांच्यासह खासदार संदीप पाठक आणि खासदार अशोक मित्तल यांनी देखील भाजपत प्रवेश केला. संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत पत्रकार परिषदेला संबोधित करताना खासदार राघव चड्ढा यांनी सांगितले की, राज्यसभेतील आम आदमी पक्षाचे दोन-तृतीयांश सदस्य म्हणून आम्ही भारताच्या संविधानातील तरतुदींचा वापर करून भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राघव चड्ढा हे भाजपमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू होती. अशात आता राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, राजिंदर गुप्ता आणि विक्रम साहनी हे देखील आपल्यासोबत येतील, असा दावा राघव चड्ढा यांनी केला आहे. ते म्हणाले, राज्यसभेत आम आदमी पक्षाचे 10 खासदार आहेत, त्यापैकी दोन-तृतीयांशाहून अधिक आमच्यासोबत आहेत. त्यांनी स्वाक्षरी केली असून, आज सकाळी आम्ही स्वाक्षरी केलेले पत्र आणि कागदपत्रे राज्यसभा अध्यक्षांकडे सादर केली आहेत. आमच्या व्यतिरिक्त हरभजन सिंग, राजिंदर गुप्ता, विक्रम साहनी आणि स्वाती मालीवाल हे देखील आहेत.
त्यांच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी व्हायचे नव्हते : चड्ढा
राघव चड्ढा यांनी सांगितले की, पक्षाच्या कार्यातून स्वतःला दूर ठेवण्यामागचे खरे कारण मी तुम्हाला सांगत आहे. मला त्यांच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी व्हायचे नव्हते. मी त्यांच्या मैत्रीस पात्र नव्हतो, कारण मी त्यांच्या गुन्ह्यांमध्ये सामील नव्हतो. आमच्याकडे फक्त दोनच पर्याय होते. एकतर राजकारण सोडून गेल्या 15-16 वर्षांत केलेले लोकसेवेचे काम सोडून देणे किंवा आमची ऊर्जा आणि अनुभव सकारात्मक राजकारणासाठी वापरणे. त्यामुळे आम्ही ठरवले आहे की, भारतीय संविधानातील तरतुदींचा वापर करून राज्यसभेतील आपचे दोन-तृतीयांश सदस्य भाजपामध्ये विलीन होतील.
‘आप’चे 10 पैकी सात खासदार सोबत
• राघव चड्ढा
• संदीप पाठक
• राजेंद्र गुप्ता
• विक्रम साहनी
• स्वाती मालीवाल
• हरभजन सिंग
• अशोक मित्तल
भाजपचा पंजाबच्या लोकांना धक्का : केजरीवाल
भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’वर आपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला. अरविंद केजरीवाल म्हणाले की, हा भाजपने पंजाबच्या लोकांना धक्का दिला आहे.


