जालना : तालुक्यातील रामनगर परिसरातील आनंद भारत गॅस गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 110 गॅस सिलिंडर चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही चोरी 14 ते 16 मार्च दरम्यान रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे.

जालना : तालुक्यातील रामनगर परिसरातील आनंद भारत गॅस गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 110 गॅस सिलिंडर चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही चोरी 14 ते 16 मार्च दरम्यान रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश करत भरलेले गॅस सिलिंडर लंपास केले. चोरीला गेलेल्या सिलिंडरमध्ये 14 किलो वजनाचे 96, 5 किलो वजनाचे 2 आणि 19 किलो वजनाचे 12 सिलिंडरांचा समावेश असून, यांची एकूण किंमत 4 लाख 51 हजार 543 रुपये इतकी आहे.
या प्रकरणी सिद्धार्थ आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच गोडाऊनमध्ये यापूर्वीही सिलिंडर चोरीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून काही ठिकाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. जालन्यातही गॅस वितरणावर त्याचा परिणाम जाणवत असून, पुरवठा विभागाने व्यावसायिक वापरासाठी होणारा गॅस पुरवठा यापूर्वीच बंद केला आहे.
तथापि, घरगुती गॅसच्या पुरवठ्याबाबत कोणतीही टंचाई नसल्याचे प्रशासनाकडून वारंवार स्पष्ट करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत गॅस गोडाऊनमधून मोठ्या प्रमाणात सिलिंडर चोरी झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
