जालना : जिल्ह्यातील ग्रामीण भागात २२ फेब्रुवारी रोजी एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांचे उद्घाटन, प्रत्यक्ष पाहणी, ग्रामस्थांशी थेट संवाद, महिला बचत गट उपक्रमांना भेट, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण तसेच शालेय उपक्रमांचे लोकार्पण अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

जालना : जिल्ह्यातील ग्रामीण भागात २२ फेब्रुवारी रोजी एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांचे उद्घाटन, प्रत्यक्ष पाहणी, ग्रामस्थांशी थेट संवाद, महिला बचत गट उपक्रमांना भेट, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण तसेच शालेय उपक्रमांचे लोकार्पण अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

मात्र यावेळी या शासकीय उपक्रमाला एक वेगळेच आकर्षण लाभणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि विनोदी अभिनयासाठी घराघरांत परिचित असलेले अभिनेते भाऊ कदम हे या कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याने ग्रामीण भागात विशेष उत्साहाचे वातावरण आहे.

दगडवाडी (ता. भोकरदन), मानेगाव, सावरगाव हडप (ता. जालना) तसेच आष्टी (ता. परतूर) येथे विविध विकासकामांची पाहणी करण्यात येणार आहे. या निमित्ताने ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यावर भर दिला जाणार आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामपंचायतींच्या विकासकामांना गती देणे आणि नागरिकांचा थेट सहभाग वाढवणे हा आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. तसेच पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पवार यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
जनसंवादाचा संगम
ग्रामीण विकासाच्या या पर्वात मनोरंजन आणि जनसंवादाचा संगम अनुभवण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी २२ फेब्रुवारी रोजी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
» संदीप पवार,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत विभाग ) जिल्हा परिषद, जालना
