धावडा : भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र जाळीचा देव यात्रेला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रासह परराज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. यात्रेतील प्रचंड गर्दी व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हरवण्याच्या घटना टाळण्यासाठी पारध पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेमुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

धावडा : भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र जाळीचा देव यात्रेला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रासह परराज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. यात्रेतील प्रचंड गर्दी व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हरवण्याच्या घटना टाळण्यासाठी पारध पोलिसांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेमुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यात्रेदरम्यान जयदेव वाडी परिसरात अर्जुन गोविंद कपाटे ६ , रा. येळेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड हा अल्पवयीन मुलगा गर्दीत हरवला होता. पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवून मुलास सुरक्षित ताब्यात घेतले व त्याची समजूत काढत नातेवाईकांच्या स्वाधीन केले. मुलगा सुखरूप मिळाल्याने कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडत पोलिसांचे आभार मानले.
तसेच ‘कृष्णा’ नावाचा आणखी एक लहान मुलगा यात्रेत हरवलेला असताना पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्याला त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले. याशिवाय फलटण जि.सातारा येथील राजकुमार वसंत घनदास हे ज्येष्ठ नागरिक गर्दीत भरकटले होते. तत्परतेने शोध घेऊन पोलिसांनी त्यांनाही सुरक्षितपणे कुटुंबियांसोबत पुन्हा एकत्र केले.
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील माया विनोद झामरे यांचा काही वर्षांपूर्वी मंदिर परिसरात हरवलेला मोबाईल प्रामाणिकपणे शोधून परत करण्यात आला. या घटनेमुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची आणि प्रामाणिकतेची पुन्हा एकदा प्रचिती आली. ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेमुळे अनेक कुटुंबांना आपल्या प्रियजनांची सुखरूप भेट घडली असून नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने, बीट जमदार जायभाये, सुरेश डुकरे, गणेश निकम, उमेश टेकाळे, सुनील जाधव व शिवाजी भगत यांनी सहकार्य केले. ही कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडली.
