प्रदीप गावंडे | बार्शीटाकळी: प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशीच बार्शीटाकळी तहसील कार्यालयात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान अर्धवट राष्ट्रगीत वाजवण्यात आले आणि या गंभीर बाबीवर जाब विचारला असता तहसीलदार रवींद्र कापशीकर यांनी पत्रकारांशी अत्यंत उद्धट वर्तन करून त्यांचा अवमान केल्याचा प्रकार घडला.

बार्शीटाकळी: प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशीच बार्शीटाकळी तहसील कार्यालयात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान अर्धवट राष्ट्रगीत वाजवण्यात आले आणि या गंभीर बाबीवर जाब विचारला असता तहसीलदार रवींद्र कापशीकर यांनी पत्रकारांशी अत्यंत उद्धट वर्तन करून त्यांचा अवमान केल्याचा प्रकार घडला.
या घटनेनंतर पत्रकार आणि नागरिकांनी तातडीने जिल्हाधिकारी मीणा आणि पालकमंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी या घटनेत दोषी असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
२६ जानेवारी रोजी बार्शीटाकळी तहसील कार्यालयात शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरू करण्यात आले, मात्र ते पूर्ण न वाजवता अर्ध्यावरच थांबवण्यात आले. ‘भारतीय ध्वजसंहिता’ आणि ‘प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट’नुसार राष्ट्रगीत पूर्ण न होणे हा राष्ट्रगीताचा अवमान मानला जातो.
पत्रकारांशी गैरवर्तन
प्रोटोकॉलचा भंग झाल्याचे लक्षात येताच उपस्थित पत्रकारांनी या गंभीर चुकीबाबत तहसीलदार रवींद्र कापशीकर यांना विचारणा केली. मात्र, आपली चूक मान्य करण्याऐवजी तहसीलदारांनी सर्व गणमान्य व्यक्तींसमोर पत्रकारांना अपमानित केल्याचा आरोप पत्रकारांकडून करण्यात आला आहे. या वर्तणुकीमुळे उपस्थित नागरिकांमध्ये आणि पत्रकार वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कारवाईची मागणी
राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्या आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या तहसीलदारांचे निलंबन करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. या घटनेचा स्थानिक पत्रकार संघाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.
