National Association for the Blind : समजाच्या मुख्य प्रवाहापासून थोडेसे दूर राहिलेले, दिव्यांग बांधवांच्या जीवनात संसाराची गाठ बांधून त्यांच्या साथीदारासोबत जगण्याची उमेद वाढविण्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, बुलढाणा अर्बन व समाज कल्याण विभागाद्वारे दिव्यांग वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बुलढाणा : समजाच्या मुख्य प्रवाहापासून थोडेसे दूर राहिलेले, दिव्यांग बांधवांच्या जीवनात संसाराची गाठ बांधून त्यांच्या साथीदारासोबत जगण्याची उमेद वाढविण्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, बुलढाणा अर्बन व समाज कल्याण विभागाद्वारे दिव्यांग वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा येथील सैनिक मंगल कार्यालयाच्या सभागृहात 31 जानेवारी रोजी हा आगळा वेगळा उपक्रम पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. वसंतराव चिंचोले यांनी पत्रकार भवन येथील पत्रकार परिषदेत दिली.
जीवन जगत असताना दिव्यांग बांधवांना अनेक अडचणी येतात. त्यांना वैवाहिक जीवनाची समस्या प्रामुख्याने भेडसावत असते. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य साथीदाराची आवश्यकता असून, त्यांच्या जीवनात संसाराची बाग फुलल्याने जगण्याची दिशा मिळेल, या हेतूने दिव्यांग वधूवर परिचय मेळाव्या आयोजित करण्यात आल्याचे डॉ. चिंचोले यांनी सांगितले. याप्रसंगी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे समन्वयक रा. आ. म्हस्के, कोषाध्यक्ष दिलीप नागरिक, विधवा परित्यक्ता चळवळीचे डी. एस. लहाणे, डॉ. शोण चिंचोले यांची उपस्थिती होती. शुक्रवार, 31 जानेवारी रोजी सैनिक मंगल कार्यालयाच्या सभागृहात सकाळी 10 वाजता वधूवर परिचय मेळाव्याला सुरुवात होईल. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राध्येशाम चांडक हे असतील तर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख उपस्थितीत सीईओ गुलाबराव खरात, नाशिकचे रामेश्वर कलंत्री, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे संयोजक विजय कान्हेकर, समाज कल्याण विभागाच्या डॉ. अनिता राठोड, मनोज मेरत, भाऊराव चव्हाण, शिक्षणाधिकारी अनिल अकाळ हे हजर असतील.
300 जणांची नोंदणी पूर्ण
वधूवर परिचय मेळाव्यासाठी 300 दिव्यांग मुलामुलींनी नोंदणी केली आहे. यामध्ये, 80 टक्के दिव्यांग मुलांचा सहभाग असून, इच्छुक दिव्यांग मुला मुलींनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.