छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजुरांचे आतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवार, 30 सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात घुसून विभागीय आयुक्त कार्यालयास घेराव घेतला होता. यावेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत विभागीय आयुक्त कार्यालय परिसर दणाणून सोडला.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजुरांचे आतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसह ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवार, 30 सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात घुसून विभागीय आयुक्त कार्यालयास घेराव घेतला होता. यावेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत विभागीय आयुक्त कार्यालय परिसर दणाणून सोडला.
मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळे बीड, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर आदी जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावातील शेतजमीनी खरवडून गेल्या आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, प्रति एकर 50 हजार रुपये पीक नुकसान भरपाई द्यावी, रोजगार बुडालेल्या शेतमजुरांना, ग्रामीण व शहरी कामगारांना श्रमनुकसान भरपाई म्हणून प्रति कुटुंब तातडीने 30 हजार रुपये महिना मदत द्यावी व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आदी मागण्यांसाठी किसान सभा, शेतमजूर युनियन व सीटूच्या वतीने मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनानंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेले पोलिसांचे बॅरिकेट तोडून आयुक्तालयात प्रवेश करुन विभागीय आयुक्त कार्यालयास घेराव घातला होता.
यावेळी झालेल्या छोटेखानी जाहीर सभेस अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, शेतमजूर युनियनचे राज्य अध्यक्ष नत्थु साळवे, राज्य सरचिटणीस मारोती खंदारे, अजय बुरांडे, उध्दव पौळ, लक्ष्मण साक्रुडकर, रेहाना शेख, भगवान भोजने, अंकुश बुधवंत, विशाल देशमुख, रोहिदास जाधव, संजय मोरे आदींनी संबोधित केले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी अजय भवलकर, भाऊसाहेब झिरपे, मनिषा बल्लाळ, अरुण मते, रखमाजी कांबळे, निशाद शेख, रमेश बुरांडे आदींनी परिश्रम घेतले.
