Farmer commits suicide in Andhera : अंढेरा मंडळातील लघु प्रकल्पात खडकपूर्णा धरणाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या युवा शेतकऱ्याने शासनाच्या दुर्लक्षपणामुळे आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना १३ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.
नंदकिशोर देशमुख / अंढेरा : अंढेरा मंडळातील लघु प्रकल्पात खडकपूर्णा धरणाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या युवा शेतकऱ्याने शासनाच्या दुर्लक्षपणामुळे आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना १३ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. मृतक शेतकऱ्याच्या कपड्यात सुसाईड नोट आढळून आली. यामध्ये त्याने, शासन आत्महत्येस कारणीभूत असल्याचे नमूद केले आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पासमोर डिसेंबर महिन्यात त्यानंतर, पुन्हा एकदा जानेवारी मध्ये मृतक युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू होते. अंढेरा मंडळात दुष्काळाचे सावट असून शेतकऱ्यांना अतिशय हाल सोसावे लागत असल्याने, यंदा ओव्हरफ्लो झालेल्या खडकपूर्णा प्रकल्पातून कालव्याद्वारे अंढेरा मंडळातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात यावे, अशी आर्त मागणी त्यांनी लावून धरली होती. त्यांच्या उपोषणानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. मात्र, अनेक दिवस उलटल्यानंतर ही आश्वासनाची पूर्तता न झाल्याने प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त झाला. यातूनच कैलास नागरे यांनी टोकाचे पाऊल उचलले. विषारी औषध प्राशन करून त्यांनी स्वतःला संपविले.
मागण्या मान्य होईपर्यंत, अंत्यसंस्कार करणार नाही…
या घटनेने संपूर्ण जिल्हाभर एकच खळबळ उडाली असून, शिवनी आरमाळ येथील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत स्व. नागरे यांच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत, नागरे यांचा मृतदेह हलवणार नाही, अशी भूमिका शिवणी आरमाळ येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. घटनेचे गांभीर्य पाहून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील आता गावाच्या दिशेने कुच केली.