..अन् नियतीने त्यांना पुन्हा शहरात बोलावून घेतले:ट्रकला धडकून दोघांचा मृत्यू ; सिरसवाडी गावावर पसरली शोककळा 

जालना : ऐन पंचविशीच्या वयातील दोन तरूण जालना येथील एमआयडीसीमधून आपले काम आटोपून सायंकाळी गावाकडे गेले होते. मात्र, काही खासगी कामासाठी ते दोघे मोटारसायकलवर पुन्हा जालना शहरात आले आणि काळाने त्यांच्यावर झडप घातली. शहराच्या जवळच असलेल्या सिरसवाडी येथील ही घटना आहे. 

जालना : ऐन पंचविशीच्या वयातील दोन तरूण जालना येथील एमआयडीसीमधून आपले काम आटोपून सायंकाळी गावाकडे गेले होते. मात्र, काही खासगी कामासाठी ते दोघे मोटारसायकलवर पुन्हा जालना शहरात आले आणि काळाने त्यांच्यावर झडप घातली. शहराच्या जवळच असलेल्या सिरसवाडी येथील ही घटना आहे. 

    अशोक बाबासाहेब गायकवाड ( 25 ), तुळशीदास भरत ढगे ( 25 ) हे दोघे मित्र होते. त्यांच्या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एमआयडीसीत ते काम करीत होते. शुक्रवारी सायंकाळी येथून काम आटोपून ते घरी आले होते. मात्र, पुन्हा काही खासगी कामासाठी हे दोघे जालना शहरात  गेले होते. काम झाल्यावर गावाकडे परतत असताना रात्री  11 वाजेच्या सुमारास अंबड चौफुली येथील डिव्हायडरवर त्यांची दुचाकी एका ट्रकला पाठीमागून धडकली. या धडकेत दुचाकी चालक तुळशीदास ढगे व अशोक गायकवाड समोर फेकल्या गेले. ट्रकच्या फाळक्याला दोघांचे डोके जोरात आदळल्याने गंभीर जखम होऊन त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांनी दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.  शनिवारी सकाळी त्यांच्यावर शिरसवाडी येथील स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

या दुर्दैवी घटनेमुळे शिरसवाडी गावावर शोककळ पसरली. कामावरून घरी आल्यानंतर हे दोघे परत शहरात गेले नसते तर कदाचित ही घटना घडली नसती. पण नियतीनेच त्यांना पुन्हा शहरात बोलावले असावे, अशा शब्दात गांवात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.  त्यांच्यावर शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे गावावर शोककळा पसरली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »